लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अक्कलकुवा ग्रामपंचायत क्षेत्रात १४ वा वित्त आयोग आणि पाच टक्के पैसा निधीत गैरव्यवहार केल्याप्रकरणी चाैकशीसाठी नोटीसा बजावण्यात आलेल्या आजी-माजी सरपंच, उपसरपंच, प्रशासक, ग्रामविस्तार अधिकारी आणि ग्रामसेवक यांनी बुधवारी जिल्हा परिषदेत हजेरी लावली. परंतू दिवसभराच्या चाैकशी योग्य तो हिशोब मिळाला नाही. परिणामी त्यांची गुरुवारी पुन्हा चाैकशी होणार आहे. जिल्हा परिषदेने नोटीसा बजावल्यानुसार सर्व ९ जण सकाळी ११ वाजेपासून आले होते. त्यांची चाैकशी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तीन विस्तार अधिकारी नियुक्त केले होते. दरम्यान पदाधिकारी व शासकीय सेवकांनी आणलेल्या हिशोबाच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. यात दिवसभर आकड्यांचा खेळ सुरु राहिल्याने निष्कर्ष निघू शकला नाही परिणामी माजी सरपंच अमरसिंग हुपा वळवी, प्रशासक आर. एम. देव, प्रशासक जे. एस. बोराळे, माजी सरपंच उषाबाई बोरा, माजी उपसरपंच ताजमहंमद अल्लारखा मक्राणी, विद्यमान सरपंच राजेश्वरी इंद्रवदन वळवी, ग्रामविकास अधिकारी व्ही. बी. जाधव, आनंदा पाडवी व ग्रामसेवक एस. आर. कोळी यांना गुरुवारी सकाळी ११ वाजेपासून पुन्हा जिल्हा परिषदेत बोलावण्यात आले आहे. त्यांच्याकडून बुधवारी काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे सादर करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. परंतू सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सर्व ९ जणांनी केवळ त्यांचे लेखी जबाब आणल्याची माहिती आहे. अक्कलकुवा ग्रामंपचातयींच्या दप्तरात मोठ्या प्रमाणात तफावती असल्याची माहिती देण्यात आली आहे. गुरुवारी दिवसभर सर्वांची समोरासमोर चाैकशी पूर्ण झाल्यानंतरही अंतिम निष्कर्ष समोर येण्यास मात्र उशिर होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे या प्रकरणाचा निकाल तातडीने लागणे शक्यच नसल्याचा दावा प्रशासकीय वर्तुळातून केला जात आहे.
उपमुख्यमंत्र्यांच्या दाै-यामुळे फावले बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाशिक येथे आले होते. यामुळे जिल्हा परिषदेतील सर्व वरिष्ठ अधिकारी हे नाशिक येथे गेले होते. यातून तीन विस्तार अधिका-यांनी अक्कलकुवा ग्रामपंचायत गैरव्यवहारप्रकरणी नोटीसा बजावलेल्या ९ जणांची चाैकशी केली. चाैकशीवेळी संबधितांनी त्यांच्या कार्यकाळात निधी खर्च केल्याचे पुरावे सादर केल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. २०१६ ते २०२० या काळात अक्कलकुवा ग्रामपंचायतीत नियुक्त ग्रामसेवक, प्रशासक आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधी यांनी शहरात केलेल्या विकासकामांमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आरोप व तक्रारी जिल्हा परिषदेकडे करण्यात आल्या होत्या. यानुसार ही चाैकशी सुरु आहे.