नंदुरबार : कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना कोरोनाच्या कामकाजातून मुक्त करावे, अशी मागणी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेतर्फे करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
बारावीच्या परीक्षा रद्द केल्याने शालेय स्तरावर नवीन मूल्यमापन पद्धतीने मूल्यमापन करण्याचे निर्देश दिले आहेत. कामकाजाचा कालावधी व वेळ निश्चित करून दिला आहे. या कालावधीमध्ये मूल्यमापनाचे काम वेळेत व अचूकपणे करून संगणक प्रणालीद्वारे मंडळाकडे सादर करावयाचे आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे काही शिक्षकांच्या सेवा अधिग्रहित केल्या आहेत. या कामांचा कालावधी सारखाच असल्याने कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांना ती करणे अशक्य आहेत. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षकांच्या बाबतीत सहानुभूतीपूर्वक विचार करून कोरोनाच्या कामातून कार्यमुक्त करावे, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनावर महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रा. संजय शिंदे जिल्हा संघटनेचे कार्याध्यक्ष प्रा. राजेंद्र शिंदे, सरचिटणीस प्रा. एस. एन. पाटील, नंदुरबार तालुका अध्यक्ष प्रा. अंकुश रघुवंशी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रा. कमर रजा यांच्या सह्या आहेत.
दरम्यान, शिक्षणाधिकारी कार्यालयानेही जिल्हाधिकारी कार्यालयाला याबाबत पत्र पाठविले आहे.