गेल्या महिन्यात चोरांकडून परिसरात मोठी घरफोडी झाली तर एका सराफाचे दुकान फोडण्याचा प्रयत्न फसला होता. दरम्यानच्या काळात मोटर सायकली व डिझेल चोरी आदि चोरींचा घटनांमध्ये वाढ झाली आहे. परिसरात भुरट्या चोरांनीही डोके वर काढले आहे. यातून गावात पोलीस चाैकीची निर्मिती व्हावी, अशी मागणी आहे.
वडाळी गाव हे सारंगखेडा पोलीस ठाणे हद्दीत समाविष्ट असून सारंगखेडा हे गाव वडाळीपासून १५ किलोमीटर अंतरावर आहे. सारंगखेडा पोलीस ठाण्यांतर्गत तोरखेडा पोलीस दूरक्षेत्रही १५ किलोमीटर अंतरावर आहे. यामुळे वडाळी परिसरात एखादी घटना, अपघात, चोरी किंवा गुन्हा घडल्यास दोन्ही ठिकाणाहून पोलीस कर्मचाऱ्यांना धावपळ करत घटनास्थळी पोहोचावे लागते. यातून ग्रामस्थांनाही कोणाकडे संपर्क करावा, हे वेळीच उमगत नसल्याने पोलिसांना घटनास्थळी पोहोचण्यास विलंब होत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे वडाळी येथे पोलीस चाैकी उभारली जावी, अशी जुनी मागणी आहे. या मागणीनुसार २००८-०९ या वर्षात तत्कालीन पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांनी पुढाकार घेत प्रयत्न केले होते. यातून ग्रामपंचायत हद्दीत पोलीस चौकीसाठी जागा देण्यात आली. तसा ठराव ग्रामपंचायतीने करून दिला त्या ठिकाणी नियोजित पोलिस चौकीच्या फलक लावण्यात आला. परंतु यानंतर मात्र कार्यवाही झालेली नसल्याने पोलीस चाैकीच्या जागी काटेरी झुडपे वाढली आहेत. याच जागेवर तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. संजय अपरांती यांच्या हस्ते त्या परिसरात वृक्षारोपण ही करण्यात आले. लोकांच्या सोयीचा उपक्रम असल्याने पोलीस चाैकीच्या बांधकामासाठी अनेकांनी साहित्य पुरविले होते. परंतु वरिष्ठ पातळीवरून या चौकीच्या बांधकामाची योग्य ती कारवाई न झाल्याने देण्यात आलेले दगड, वाळू व इतर साहित्यही लंपास झाले आहे.
सण, उत्सवासह विविध ऋतूत याठिकाणी नियुक्त होणारे पोलीस कर्मचाऱ्यांना बसस्थानक परिसरात निवारा शोधावा लागत असल्याने त्यांनाही अडचणी येत आहेत.
दरम्यान याबाबत गावचे पोलीस पाटील गजेंद्रगीर गोसावी यांना संपर्क केला असता, त्यांनी सांगितले की, बाजारपेठेचे गाव असल्याने आसपासच्या गावातील नागरिक येथे येतात. वाहनांची वर्दळ असते, गर्दी वाढल्याने चोरीसह इतर घटना घडतात. यातून पोलीस ठाणे व पोलीस दूरक्षेत्र लांबवर असल्याने याठिकाणी पोलीस चाैकी उभारली जावी, अशी मागणी आहे.