खावटी अनुदान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी ग्रामस्तरीय समित्या गठीत करण्यात आलेल्या होत्या. या ग्रामस्तरीय समितीचे अध्यक्ष तलाठी असून सचिव म्हणून आदिवासी विकास विभागाचे आश्रमशाळेचे कर्मचारी कार्यरत आहेत. सदस्य म्हणून संबंधित गावाचे ग्रामसेवक यांचा या समितीत समावेश करण्यात आलेला आहे. मात्र, सुरुवतीपासूनच तलाठी संघटनांकडून खावटी अनुदान योजनेच्या कामावर बहिष्कार टाकण्यात आलेला होता. आता या योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून लाभार्थ्यांच्या अर्जावर ग्रामस्तरीय समितीच्या अध्यक्ष, सचिव व सदस्य यांच्या सह्या केल्या जात आहेत. ग्रामसेवकांनी या अर्जावर सह्या करण्यास सुरुवात केली असली तरी तलाठ्यांकडून अद्याप या अर्जावर सह्या करण्यास नकार दिला जात होता.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी खावटी योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकामी जिल्ह्यातील सर्व सहाही तहसीलदारांना पत्र देऊन त्यांच्या अधिनस्त असणाऱ्या तलाठ्यांना प्रकल्प कार्यालयाशी समन्वय साधून योग्य ते सहकार्य करण्याकामी आदेशित केले होते. याबाबत तलाठी संघटनेची भूमिका जाणून घेतली असता जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राबाबत जिल्हा तलाठी संघाचे राज्य संघाशी बोलणे झाले असून स्थानिक स्तरावर त्याबद्दल निर्णय घेण्याचे सूचविण्यात आले आहे. त्यानुसार सोमवारपासून जिल्ह्यातील सर्व तलाठ्यांकडून खावटी योजनेचे कामकाज केले जाणार आहे.
सध्या कोरोनाच्या प्रतिकूल परिस्थितीत संवेदनशीलता जपून लोकांच्या कामाला प्राधान्य देण्याच्या भूमिकेतून तलाठी संघाने खावटी अनुदान योजनेचे काम करण्याची तयारी दर्शविली आहे. सोमवारपासून जिल्ह्यातील सर्व तलाठी खावटी अर्जावर सह्या करतील.
-शिरीष परदेशी, जिल्हा अध्यक्ष, नंदुरबार जिल्हा तलाठी संघ