नुकताच केंद्र शासनाने देशाचा अर्थसंकल्प जाहीर केला. या अर्थसंकल्पात पेट्रोलियम पदार्थांवर अतिरिक्त भार लावल्याने पेट्रोल-डिझेल या इंधनाच्या किमती वाढणार असून यामुळे दळणवळण महागणार असल्याने महागाई वाढणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलियम पदार्थांच्या किमती कमी असतानाही देशात मात्र पेट्रोल शंभरीकडे वाटचाल करत आहे. अर्थसंकल्पापाठोपाठ केंद्र शासनाने घरगुती गॅसच्या किमतीतही वाढ केली आहे. यामुळे सर्वसामान्य माणसांचे महिन्याचे बजेट कोलमडणार आहे. अगोदरच डाळी व तेल यासह जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे, अशा परिस्थितीत सर्वसामान्य माणसाला दिलासा देण्याऐवजी केंद्र शासनाने पेट्रोलियम पदार्थांच्या किमतीत वाढ करून सर्वसामान्य माणसाचे जीवन जगणे मुश्कील केले आहे. केंद्र शासनाने पेट्रोलियम पदार्थांवरील अतिरिक्त भार तत्काळ रद्द करून पेट्रोल-डिझेल व घरगुती गॅसच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणाव्यात, अशी मागणी आंदोलनकर्त्या महिलांनी केली.
यावेळी गॅस सिलिंडरचा वापर करणे खर्चिक होणार असल्याने आंदोलनकर्त्या महिलांनी चुलीवर भाकरी थापून केंद्र सरकारचा निषेध केला. महिलांनी अनोख्याप्रकारे आंदोलन केल्याने संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरले.