सभेत भरत गावीत यांनी जिल्हा परिषदेची कामे ठेकेदार ३० ते ४० टक्के कमी दराने घेत असल्याने नवापूर तालुक्यात दर्जेदार व गुणवत्तापूर्ण कामे यातून होऊ शकत नाहीत. त्यामुळे शासनाचा पैसा वाया जातो. तालुक्यातील १० टक्के पेक्षा जास्त कमी दराच्या निविदांची कामे होऊ देणार नाही. तसेच जिल्हा परिषदेच्या सभेत ज्या कामाच्या तक्रारी वारंवार होतात, त्यांच्यावर कार्यवाही केल्याची माहीतच मिळत यापुढे सदस्य सभेला येणारच नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
सदस्य भरत गावीत यांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी समन्वय सभेत अधिकाऱ्यांकडून आढावा घ्यावा व पुन्हा त्याच विषयावर सभागृहात चर्चा होणार नाही याकडे लक्ष द्यावे, असे सांगितले.
सदस्य विजय पराडके यांनी धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील आचारसंहितेमुळे थांबलेले अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या भरती लवकर कराव्यात, अशी मागणी केली. यावर उत्तर देताना मुख्य कार्यकारी अधिकारी गावडे यांनी सात दिवसांच्या आत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश संबंधितांना दिले.
दरम्यान खुटांमोडी येथील बालविकास प्रकल्प अधिकारी मुख्यालयाला हजर राहत नसल्याने त्यांचेवर कारवाई करावी. काठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारातील हायमास्ट लावल्यापासून बंद असल्याची व बर्डी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना ठेकेदाराने पाणीपुरवठ्याचे काम न केल्यामुळे पाण्यापासून वंचित राहावे लागत असल्याची तक्रार सी.के. पाडवी यांनी केली. अर्चना गावीत यांनी नंदुरबार तालुक्यातील ढेकवद येथे जि. प. शाळेची एकच वर्ग खोली असून तेथे आणखी वर्गखोल्या द्यावेत, अशी मागणी केली. विजय पराडके यांनी धडगाव तालुक्यातील तोरणमाळ परिसरात मध्य प्रदेश मार्गे कूपनलिका करावयाचे वाहन आणून त्या पूर्ण कराव्यात व राजबर्डी आरोग्य केंद्रासाठी जागा देणाऱ्या व्यक्तीच्या पाल्यांना जिल्हा परिषद भरतीत प्राधान्य देऊन सामावून घ्यावे आदी मागण्या केल्या. सदस्य देवमन पवार यांनी नंदुरबार तालुक्यातील आष्टे आरोग्य केंद्रातील इमारत दुरुस्तीच्या कामाचे टेंडर झाले आहे. परंतु काम पूर्ण होत नाही या कामाला मुदत देण्याचे सांगून दुरुस्तीचे काम रखडल्याने कर्मचारी तेथे राहत नसल्याचे सांगितले. ठाणेपाडा आश्रमशाळेत पाण्याची व्यवस्था नाही त्यासाठी गावातून पाइपलाइनद्वारे पाणी आणावे तसेच पाऊस नसल्याने गुरांना चारा व पाण्याची व्यवस्था करावी, अशी सूचना त्यांनी मांडली.
सभेत विषय समित्यांचा आढावा घेण्यात आला. सूत्रसंचालन डाॅ. वर्षा फडोळ यांनी केले.