लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : रात्रीच्या संचारबंदीची पहिल्याच दिवशी काटेकोरपणे अंमबलजावणी झाली. रात्री उशीरापर्यंत गजबजणारे चौक, बाजार सायंकाळी सात वाजताच सामसूम झाले. ठिकठिकाणी पोलिसांचे गस्ती वाहन व्यावसायिकांना बंदचे आवाहन देखील करीत होते. पहिला दिवस असल्याने पोलिसांनी सामंजस्याने घेत दंडुक्यांचा वर्षाव केला नसल्याचे चित्र होते. जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्णांमुळे जिल्हा प्रशासनाने रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. सायंकाळी सात ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदीचे आदेश आहेत. गुरुवारी अंमलबजावणीचा पहिला दिवस होता. लोकांची एवढ्या लवकर व्यवसाय बंद करण्याची मानसिकता नसल्याने पोलिसांना गस्ती वाहन फिरवून व्यावसायिकांना बंदचे आवाहन करण्यात आले. अंमलबजावणीचा पहिला दिवस असल्यामुळे सक्ती करण्यात आली नाही. सामंजस्याने सांगून व आवाहन करून सायंकाळी सात वाजता बाजारपेठ बंद करण्यात आली. नागरिकांंनी व व्यावसायिकांनी देखील सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
सात वाजताच झाले चौक सामसूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 21:38 IST