तळोदा : राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी यंदा पासून ई-पीक पाहणीचा उपक्रम सुरू केला असून, त्याची महसूल प्रशासनाने प्रत्यक्ष अंमलबजावणीही सुरू केली आहे.
तळोदा तालुक्यातील शेतकऱ्यांकडे शासनाचे तलाठी आणि कृषी विभागाचे कर्मचारी यासाठी प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतकऱ्यांकडून आपल्या शेतातील पीक पेऱ्याची माहिती भरून घेत आहे. यामुळे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. शासनाच्या या ई-पीक पाहणी उपक्रमाची माहिती जाणून घेण्यासाठी उपजिल्हाधिकारी बालाजी क्षीरसागर यांनी बुधवारी दुपारी तळोदा येथे भेट देऊन प्रशासनाकडून माहिती जाणून घेतली. एवढेच नव्हे, तर त्यांनी प्रत्यक्षात प्रगतिशील शेतकरी राजाभाई वाणी यांच्या शहारानजीक असलेल्या शेतात जाऊन पिकाची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्याने मोबाइल ॲपमध्ये भरलेली ई-पीक पेऱ्याची माहिती पाहिली व याबाबत येणाऱ्या अडचणींसंदर्भात शेतकऱ्यांना विचारले. त्यावेळी शेतकऱ्यांनी शासनाच्या या उत्कृष्ट उपक्रमाचे कौतुक केले. यात खरोखर पीक पेऱ्याची वस्तुनिष्ठ माहिती मिळेल. त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी तहसीलदार गिरीश वाखारे, तळोदा मंडळ अधिकारी एस.बी. पाटील, मंडळ अधिकारी एस.के. सरगर हे उपस्थित होते.