सोमवारी पहाटे जयनगरसह परिसरातील सर्वच गावांमध्ये पावसाचे जोरदार आगमन झाले. यामुळे कापूस, मका, मूग, बाजरी, ज्वारी, मिरची यासारख्या पिकांना जीवदान मिळाले आहे; तर केळी, पपई, ऊस यासारख्या पिकांची वाढ जोमाने होण्यास या पावसामुळे मदत होणार आहे. शनिवारी संध्याकाळी जयनगरसह कहाटूळ, लोंढरे, कोंढावळ या भागांमध्ये हलका स्वरूपाचा पाऊस पडला होता. हा पाऊस १५ दिवसांनंतर आल्यामुळे पिकांना थोडेफार जीवदान मिळाले होते. दुसर्यादिवशी अनेक शेतकऱ्यांनी या पावसावरच कापूस, मिरची, पपई, केळी यासारख्या पिकांना रासायनिक खते दिली होती. आता पावसाची सुरुवात झाली, या आशेने शेतकऱ्यांनी रासायनिक खते टाकली होती. रविवारी दिवसभर केवळ चटका देणारे उन्हाशिवाय वातावरणात पाऊस येईल, याचा काही अंदाज नव्हता. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी रासायनिक खते पिकांना टाकली होती, ते शेतकरीही चिंताग्रस्त झाले होते. एक तर पाऊस येत नव्हता. त्यामुळे बहुतांश शेतकरी दुबार व तिबार पेरणीच्या धाकामुळे चिंतातूर होत होते. मात्र शनिवारी हलका पाऊस पडल्यामुळे दुसऱ्यादिवशी ज्या शेतकऱ्यांनी रासायनिक खते टाकले, ते पाऊस येईल का नाही? या चिंतेत होते. मात्र सोमवारी पहाटे जयनगरसह परिसरात पावसाचे जोरदार आगमन झाल्यामुळे शेतकरी दुबार व तिबार लागवड व पेरणीपासून मुक्त झाला असून, ज्या शेतकऱ्यांनी रासायनिक खते लावली होती, त्यांचाही यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. या पावसामुळे सगळ्याच पिकांची वाढ होण्यास मदत होणार आहे. शिवाय पावसाच्या जोरदार आगमनामुळे अनेक ठिकाणी नाले भरल्यामुळे जनावरांची पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे. जुलै महिन्यात दोन आठवडे उलटल्यावर हा पहिलाच जोरदार पाऊस झाल्यामुळे जयनगरसह परिसरातील शेतकरी सुखावला असून, त्यामुळे आपण लावलेल्या पिकांमधून चांगले उत्पन्न येईल, अशी आशा निर्माण झाली आहे.
जयनगरसह परिसरात पावसाचे जोरदार आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:35 IST