शासनाकडून जिल्ह्यासाठी पहिल्या टप्प्यात १२ हजार १४० डोस पाठवण्यात आले होते. यासाठी १० हजार ८५७ आरोग्य कर्मचारी, केंद्रीय यंत्रणांचे १ हजार ९७९ फ्रंट लाईन वर्कर्स यांची नोंदणी पूर्ण करण्यात आली आहे. शासकीय आणि खासगी वैद्यकीय अधिकारी, तंत्रज्ञ कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा यांच्या लसीकरणासाठी माहिती भरुन घेण्यात आल्यानंतर यातील वयाने कमी आणि शारीरिक क्षमता अधिक सक्षम असलेल्या कर्मचाऱ्यांना जिल्ह्यात प्रथम मान देत लसीकरणाचा प्रारंभ करण्यात आला होता. याअंतर्गत दर दिवशी ७०० जणांना उद्दिष्ट ठेवत कामकाज सुरु असून सात ठिकाणी लसीकरणाचे काम सुरु आहे. प्रथम टप्प्यात आरोग्य यंत्रणेत काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्साह दाखवल्याने आतापर्यंत जिल्ह्याचे एकूण लसीकरण हे ६० टक्के झाले असल्याची माहिती समाेर आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नोंदणी झालेल्या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय माहिती जाणून घेण्यात आली होती. यातून गंभीर व दुर्धर आजार तसेच वयाची पन्नाशी पार केलेल्यांना वगळण्यात आले होते, परंतु यानंतरही काहींनी जुन्या आजारांचा बहाणा करत लसीकरणाला प्रारंभी दांडी मारली होती.
लसीकरणात आशा आणि अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनाही सहभागी करुन घेण्यात आले आहे. त्यांचा या लसीकरणासाठीचा प्रतिसाद हा सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे. ग्रामीण भागात राहून पुढे राहणाऱ्या आशांचे ७० टक्के लसीकरण पूर्ण झाला असल्याचा दावा करण्यात आला आहे. यातून त्यांचा प्रतिसाद लक्षात येतो.
लस घेतल्यानंतर हलकासा ताप तसेच इतर काही किरकोळ लक्षणे जाणवत असल्याचे लसीकरण झालेल्यांकडून सांगण्यात आले आहे. त्याउपर गंभीर असे आजारपण आले नसल्याचा दावा करण्यात आला आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसात १०० टक्के लसीकरण करण्यासाठी सर्व सात सेंटर्सवर प्रयत्न होत असल्याची माहिती देण्यात आली आहे.