या वेळी शहाद्याचे प्रांताधिकारी डॉ. चेतन गिरासे, महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.व्ही.एस. श्रीवास्तव, उपप्राचार्य महेंद्र रघुवंशी, विधी महाविद्यालयाचे प्राचार्य चौधरी, एम.एस. रघुवंशी उपस्थित होते. प्रांताधिकारी डॉ. गिरासे म्हणाले की, आजच्या युगात स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी महागड्या क्लासेसची नव्हे तर जिद्द आणि परिश्रमाची गरज आहे. अभ्यासात सातत्य आणि ध्येयपूर्तीची तीव्र इच्छा असेल तर यशाला गवसणी घालता येते. स्पर्धा परीक्षांमध्ये चुरस दिसून येत आहे. यामुळे अनेक जण मेट्रो सिटींमध्ये जाऊन क्लासेसच्या माध्यमातून यशाचा मार्ग शोधत असल्याचे दिसून येते. मात्र अभ्यास करण्याची तयारी असेल तर नंदुरबारातूनही यश मिळविता येणे सहज शक्य आहे. अभ्यासक्रमाची नीट माहिती घेऊन योग्य वेळापत्रक तयार करून योग्य नियोजन केल्यास सहज यश मिळविता येणे. आपल्यातील कौशल्य ओळखून प्रत्येकाने त्यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. तसे केल्यास यश मिळविणे सहज शक्य होत असल्याचे डॉ. गिरासे म्हणाले. प्रास्ताविक दिग्विजय राजपूत यांनी केले. सूत्रसंचालन हर्षल पाटील तर आभार जितेंद्र पाटील यांनी मानले. शिबिरासाठी सुनील गिरासे, हर्षल पाटील आदींनी परिश्रम घेतले.
जीटीपी महाविद्यालयात स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:31 IST