लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : तळोदा तालुक्यातील केळी उत्पादक शेतकरी संकटात सापडला असून, केळीला प्रती क्विंटल ३५० ते ४०० रुपये एवढा दर मिळत आहे. या वेळी केळी खरेदीत व्यापाऱ्याकडून मनमानी करण्यात येत असल्याचे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे.. व्यापाऱ्याकडून दिल्लीतील शेतकरी आंदोलन व बर्फवृष्टीचे कारण दिले जात असून, कमी दरात व्यापाऱ्यांकडून केळीची खरेदी करण्यात आली आहे. त्यामुळे झाडावरील केळीचे अतोनात नुकसान होत आहे. किरकोळ विक्रीत केळीला २० ते ३० रुपये डझन दर मिळत असतानाही व्यापारीमात्र शेतकऱ्याकडून अल्प दरात केळीची खरेदी करीत आहे. केळी पिकाला एकरी ६० ते ६५ हजार खर्च येत असून, गेल्या वर्षी वादळ व पावसामुळे केळीचे नुकसान झाले होते. दरवर्षीच्या नापिकीमुळे उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नैराश्य व्यक्त होत आहे. केळी उत्पादक व व्यापाऱ्यांमध्ये प्रशासनाने मध्यस्थीची भूमिका ठेवून केळीला योग्य दर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
केळीचे दर घसरल्याने शेतकरी संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 13:24 IST