लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहादा शहरातील उद्योजकाची मुंबई येथील फार्मा कंपनीतील तिघांनी ६१ लाख रूपयात फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आॅगस्ट २०१९ ते जुलै २०२० दरम्यान हा प्रकार घडला होता. किशोर नरोत्तम पाटील रा. गुजर गल्ली, शहादा असे फसवणूक झालेल्या उद्योजकाचे नाव आहे. किशोर पाटील यांची पपईतून द्रव काढून त्यापासून पावडर तयार करणारी एस.आय.बायोझाईम नावाची कंपनी आहे. संबधित कंपनीकडून भिवंडी येथील बालाजी इन्झाईम अँड केमिकल कार्पोरेशन ही कंपनी वेळोवेळी पावडर खरेदी करत होती. दरम्यान आॅगस्ट २०१९ पासून किशोर पाटील यांच्याकडून संबधित कंपनीचे अधिकारी पावडर खरेदी करत होते. परंतु खरेदीची रक्कम मात्र संबधितांनी दिली नव्हती. जुलै २०२० पर्यंत हा प्रकार सुरू होता. कंपनीमालक पाटील यांनी तगादा लावूनही संबधित खरेदीदार कंपनीकडून पैसे देण्यात येत नव्हते. यातून फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी शहादा पोलीस ठाण्यात धाव घेतली. याबाबत त्यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार पलक अभय केन्या, अभय अरूण केन्या, अरूण कुमार केन्या सर्व रा. ओवली गाव भिवंडी यांच्याविरोधात शहादा पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिवंडी येथील संशयितांकडून चालवण्यात येणारी कंपनी ही फार्मास्युटिकल अर्थात औषधी तयार करण्याची कंपनी असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यांच्याकडून गेल्या अनेक वर्षापासून पपईची पावडर शहादा परिसरातून खरेदी करण्यात येते. तपास सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघ करत आहेत. दरम्यान या प्रकरणी अद्याप कोणासही अटक किंवा कारवाई करण्यात आलेली नसल्याची माहिती देण्यात आली आहे. या प्रकाराने खळबळ उडाली आहे.
उद्योजकाला ६१ लाखात गंडवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 13:02 IST