जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. परंतु हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. सातपुड्यातील दऱ्याखोऱ्यात पडलेल्या पावसामुळे गोमाई नदीला पूर आला आहे. पुरामुळे मात्र कुठेही नुकसान झाले नाही. तापीवरील हतनूर धरणातून पाणी सोडण्यात आल्याने पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी सारंगखेडा प्रकल्पाचे दोन दरवाजे पूर्णपणे उघडून ४३ हजार २४ क्युसेकने व प्रकाशा बॅरेज मध्यम प्रकल्पाचे तीन दरवाजे पूर्णपणे उघडून ५७ हजार ६६६ क्युसेक इतका विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे. हतनूर धरण क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने पाणी प्रवाह अजून वाढण्याची शक्यता आहे. पाण्याचा येवा लक्षात घेता, नदीपात्रात विसर्ग वाढू शकतो.
तापी काठावरच्या गावांतील नागरिकांनी तापी नदीपात्रामध्ये आपली गुरेढोरे सोडू नयेत अथवा नदीकाठाजवळ जाऊ नये, नदीमधील पाण्याचे पंप सुरक्षितस्थळी हलवावेत, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सुधीर खांदे यांनी कळविले आहे.