येथील नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी ह्या प्रभाग क्रमांक एकचे नेतृत्व करतात. त्यांनी आपल्या प्रभागातील खर्डी नदीवर संरक्षक भिंत बांधणे, आमराईफळीत काँक्रिटीकरण, दलेलपूर पुलाजवळ अमरधाम बांधणे अशी एकूण साधारण साडेसहा कोटीच्या कामांचे इस्टिमेट तयार करून तांत्रिक मान्यतेसाठी गेल्या तीन वर्षांपासून पालिकेत सादर केले आहे. तथापि, त्यास अजूनही तांत्रिक मान्यता देण्यात येत नाही. तांत्रिक मान्यतेसाठी पालिका फंडात पैसे नसल्याचे कारण नेहमी पुढे केले जात असते. वास्तविक माझा प्रभाग हा खर्डी नदीलगत असल्याने पावसाळ्यात पुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरत असते. त्यामुळे ही कामे प्राधान्याने घेण्याची आवश्यकता आहे. तथापि, निधीची सबब पुढे करून आजतागायत टाळण्यात येत आहे. भांडार विभागात विविध वस्तू दुप्पट किमतीत खरेदी करण्यात येतात. त्यावेळी पालिका फंडात पैसा असतो. मात्र माझ्या प्रभागातील विकास कामांनाच पैसा नसतो. केवळ दुजाभाव केला जात असल्यामुळेच आडकाठी आणत असल्याचा आरोपदेखील त्यांनी केला आहे. याशिवाय काॅलेज चौफुलीपासून आंबेडकर चौकाच्या नाल्यावर अंडर ग्राउंड गटारचा ठरावसुद्धा घेतला होता. तीन वर्षे होऊनही ते काम अजून मंजूर करण्यात आलेले नाही. त्याचबरोबर पालिकेसमोरील अतिक्रमण हटविण्याबाबत प्रशासनास वारंवार सांगूनही अजून ते हटविण्यात आलेले नाही. माझ्या प्रभागात काही चांगली कामे झालेली असताना ठेकेदाराची बिले काढताना विलंब केला जातो. पालिका हद्दीतील मुख्य रस्त्यावर निकृष्ट दर्जाचे सौर दिवे लावले आहेत. ते चार तास सुध्दा चालत नाही. अशा सगळ्या कामांबाबत पालिका प्रशासन सूचना देऊनही गांभीर्याने लक्ष घातले जात नसल्याच्या निषेधार्थ त्यांनी गुरुवारी पालिका प्रशासनाच्या दालनाबाहेर एका दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले होते. याप्रकरणी प्रशासनाने लवकर कार्यवाही हाती घेतली नाही तर पुढेही बेमुदत उपोषण छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. तळोदा पालिकेत सध्या भाजपची सता आहे. त्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यालाच उपोषण करावे लागत असल्याने आपसातील मतभेदांबाबत तळोदा शहरात एकच चर्चा रंगली आहे.
सत्ताधाऱ्यांमध्ये सुरू राहतेय धुसफूस
तळोदा नगरपालिकेत भाजपची सत्ता आहे. शिवाय पालिकेत त्यांना पूर्ण बहुमत आहे. परंतु गेल्या चार वर्षांपासून या सत्ताधाऱ्यांमध्ये अधूनमधून अंतर्गत धुसफूस रंगत असल्याचे चित्र पहावयास मिळते. कारण सहा महिन्यांपूर्वीही एका गटाने पालिकेच्या सर्वसाधारण सभेतून माघार घेतली होती. त्यावेळी सभाच तहकूब करण्याची नामुष्की पत्करावी लागली होती. आताही उपनगराध्यक्षांनी प्रभागातील विकास कामांना हेतूत: टाळले जात असल्याचा आरोप करीत चक्क उपोषणाचे हत्यार उपसल्याने सत्ताधाऱ्यांमधील गटबाजी उफाळून आली आहे.
कोरोना काळात पालिका फंडात निधीची अडचण होती. आता फंड उपलब्ध झाला आहे. शहरात साडेआठ कोटींच्या विकास कामांच्या तांत्रिक मान्यतेसाठी प्रस्ताव प्रशासनाकडे पाठवला आहे. याशिवाय सदर प्रभागातही साडेतीन कोटींची कामे तांत्रिक मान्यतेसाठी बुधवारीच प्रस्ताव पाठवला आहे. सध्या या प्रभागात ७० लाखांची कामे सुरू आहेत. पालिकेबाहेरील अतिक्रमणे हटविण्याची कार्यवाही लवकरच हाती घेण्यात येईल.
-सपना वसावा, मुख्याधिकारी, नगरपालिका तळोदा