वडाळी येथील विद्यार्थ्यांना शहादा, लोणखेडा, मंदाणे याठिकाणी शिक्षणासाठी प्रवास करावा लागतो. शाळा सुटल्यानंतर संध्याकाळी सव्वासात वाजता शहादा-जयनगर ही बस विद्यार्थ्यांना जयनगरपर्यंतच असल्याने विद्यार्थ्यांना व प्रवाशांना अडचणीचे होते. ही बस जयनगरऐवजी वडाळीपर्यंत मुक्कामी केल्यास मध्य प्रदेशात जाण्यासाठीही या बसचा वापर होणार असून, ही बस प्रवाशांच्या सोयीची होणार आहे. वडाळी हे गाव प्रमुख बाजारपेठेचे गाव असून, १५ ते २० खेड्यांचा संपर्क या गावाशी येतो. यातील बहुतेक लोक व्यापारी असून, त्यांना मध्य प्रदेशात जाण्यासाठी सोयीचे होणार आहे. रात्री उशिरापर्यंत शहादा येथून वडाळीसाठी बस उपलब्ध नसल्याने जयनगर मुक्कामी बस वडाळी मुक्कामी करण्यात यावी, या मागणीचे निवेदन वडाळी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने शहादा आगारप्रमुख योगेश लिंगायत यांना देण्यात आले. निवेदन देण्यासाठी सुनील माळी, राहुल चौधरी, हेमंत माळी आदी उपस्थित होते.
जयनगर मुक्कामी बस वडाळीपर्यंत करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:31 IST