निवेदनात म्हटले आहे की, शिक्षकांच्या बदली धोरणात सुधारणा होऊन सर्वसमावेशक शासन निर्णय येईल अशी शिक्षकांना अपेक्षा होती. गेली दोन वर्षे अभ्यास गट यावर काम करत होता. परंतु त्यात सुधारणा होण्याऐवजी आणखी त्रासदायक बदली धोरण आल्याची शिक्षकांत भावना झाली आहे. ऑनलाइन बदलीचा निर्णय हा अवघड-सोपे क्षेत्र केंद्रबिंदू मानून झाला होता. या शासन निर्णयात अवघड क्षेत्राचे निकष जटिल करून अवघड क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांवर अन्याय होणार आहे. तसेच अवघड व प्रतिकूल क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी एक वर्षानंतर बदलीचा अधिकार काढण्यात आलेला आहे. एकल शिक्षकांचा कोणताही विचार झालेला नाही त्यामुळे संघटनेने बदल्यात दुरुस्ती सुचवली असून, त्यानुसार शुद्धिपत्रक काढण्याची मागणी केली आहे.
विनंती बदलीसाठी तीन वर्षे सेवा धरण्यात यावी
महिलांसाठी प्रतिकूल क्षेत्रात कार्यरत महिला शिक्षिकांचा बदलीचा अधिकार कायम ठेवावा. सन २०१८ व सन २०१९ च्या बदल्यांमध्ये विस्थापित झालेल्या शिक्षकांना बदलीमध्ये प्राधान्य द्यावे. बदलीसाठी सेवा कालावधी ३१ मेऐवजी ३० जून धरण्यात यावा. सन २०१७ च्या शासन निर्णयानुसार निश्चित झालेल्या अवघड क्षेत्रामध्ये तीन वर्षे सेवा पूर्ण केलेल्या शिक्षकांना बदली अधिकार देण्यात यावा व अवघड क्षेत्रातून सोप्या क्षेत्रात बदली झाल्यानंतर तीन वर्षांनंतर विनंती बदलीची संधी देण्यात यावी. सध्या ३० किलोमीटरच्या आत असणाऱ्या व यावर्षी बदलीपात्र पती-पत्नी शिक्षकांना एकत्र फाॅर्म भरण्याची सवलत देण्यात यावी. तसेच आंतरजिल्हा बदलीसाठी १० टक्के रिक्त जागेची अट रद्द करावी. पेसा व नक्षलग्रस्त क्षेत्रातील शिक्षकांना प्राधान्य देण्याबाबत मागणी केली असून, या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा. नंदुरबार जिल्ह्यात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अवघड व साधारण क्षेत्र निश्चित करून बदलीपात्र, बदली अधिकारपात्र व रिक्त शाळांच्या याद्या जाहीर कराव्यात. महिलांसाठी अवघड क्षेत्रातील प्रतिकूल व अनुकूल शाळा कायम ठेवाव्यात, अशी अपेक्षा मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्याकडे जिल्हाध्यक्ष मोहन बिसनारीया, सरचिटणीस अशोक देसले, उपसरचिटणीस उमेश कोळपकर, अजय शिंपी, कार्याध्यक्ष ओजू पाडवी, फुलसिंग वसावे, उपाध्यक्ष महेंद्र बैसाणे, आतिराम पवार, लक्ष्मण परदेशी, रत्नकांत भोईटे, संजय खैरनार, संजय देवरे, अमृत पाटील, जितेंद्र वळवी, दारासिंग वळवी, किशोर चौधरी, लोटन जगदाळे, शंकर वसावे, कैलास लोहार, जुगनू वसावे, महेंद्र चौधरी, रवींद्र बैसाणे, राजू चौरे, विशाल पाटील, नितीन शिंपी, योगेश सोनवणे, मोना वसावे, सोनू ठाकरे, सुरूपसिंग वळवी, मोगीलाल चौधरी, कोमलसिंग पाडवी यांनी मागणी केली आहे.