बैठकीस खासदार डॉ. हिना गावित, आमदार राजेश पाडवी, सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि गणेश मंडळाचे पदाधिकारी, तसेच शांतता कमिटीचे सदस्य उपस्थित होते.
जिल्हाधिकारी खत्री म्हणाल्या की, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही कायम आहे. तिसरी लाट आलीच, तर ती खूप धोकादायक असू शकते. त्यामुळे राज्य शासनाने गणेशोत्सवाबाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन सर्वांनी करावे. ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पनेनुसार सार्वजनिक गणेशमंडळांनी श्रींची स्थापना करावी. आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. सण-उत्सवाच्या काळात अनावश्यक गर्दी करू नये. मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा.
वीज वितरण कंपनीने उत्सव काळात अंखड वीजपुरवठा सुरू राहील यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. नगरपालिका प्रशासनाने रस्त्यावर खड्डे पडले असतील त्याठिकाणी भराव करून दुरुस्तीची कामे करावीत, असे निर्देश त्यांनी दिले.
खासदार डॉ. गावित म्हणाल्या की, जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी शेजारील जिल्ह्यामध्ये डेल्टा प्लस रुग्ण आढळत असल्याने यंदाचा गणेशोत्सव साजरा करताना शासनाच्या मार्गदर्शक सूचनाचे पालन करावे.
आमदार पाडवी म्हणाले की, सर्व गणेश मंडळांनी शक्यतोवर लहान आकाराच्या मूर्तींची स्थापना करावी. शाडूच्या पर्यावरणपूरक मूर्तीचा वापर करावा. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी रक्तदानासारखे आरोग्यविषयक उपक्रम. आरोग्य शिबिरे आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे.
पवार म्हणाले, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून येणारा गणेशोत्सव साधेपणाने, सुरक्षित व संयमाने साजरा करावा. आगामी सण-उत्सव काळात नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले. यावेळी उपस्थित सदस्यांनीही मनोगत व्यक्त करून सूचना मांडल्या. त्यावरही चर्चा करण्यात आली.