नंदुरबार : तालुुक्यातील बलवंड येथे गौण खनिजाची रॉयल्टी भरण्याबाबत वारंवार सूचना करुनही संबंधितांनी दुर्लक्ष केल्याने अखेर संबंधित सात शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर सुमारे ३० लाख रूपयांचा बोजा चढविण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले आहेत. बलवंड ग्रामपंचायतीने सन २०१० ते २०१८ या कालावधीत गौण खनिज उत्खननासाठी तसेच गोळा करण्यासाठी व दुसऱ्या जागी नेण्यासाठी किंवा इतर ठिकाणी उचलून घेऊन जाण्यासाठी अथवा त्याची विल्हेवाट लावण्यासाठी वापरलेल्या कोणत्याही सामुग्रीबाबत परवानगी घेतली नव्हती. तसेच सार्वजनिक कामासाठी वापरलेली रॉयल्टी शासन दरबारी भरणा केली नव्हती. त्याबाबत सातत्याने सूचना देऊनही संबंधित रक्कम शासन दरबारी भरणा केलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६चे कलम ४८ (८) १ मधील तरतुदीनुसार पांडुरंग राजाराम पाटील, पंकज सुरेश पाटील, लक्ष्मण आर. पाटील, बन्सीलाल दगा भोई, विवेक रवींद्र पाटील, संदीप पाटील, सागर पांडुरंग पाटील या सातजणांच्या सातबाऱ्यावर सुमारे ३० लाख रूपयांचा बोजा चढविण्याचे आदेश तहसीदारांनी संबंधित खर्देखुर्द येथील तलाठ्यांना दिले आहेत. यासंदर्भात मनसेने प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती.
गौण खनिजची राॅयल्टी न भरल्याने सातबाऱ्यावर बोजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:34 IST