लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : येथील चार पोल्ट्रीमधील आठ कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याने रविवारपासून राज्यातील सर्वात मोठ्या किलिंग ऑपरेशनला नवापुरात सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी यंत्रणेची कमतरता असल्याने पिंपळनेर चौफुलीजवळील डायमंड पोल्ट्रीत ४० हजार कुक्कुट पक्षी नष्ट करण्यात आले. दुसऱ्या दिवशी ८२ पथकांव्दारे नवापूर शहरातील डायमंड, परवेज पठाण, आमलीवाला, सहयोग, वासीम या पोल्ट्रीत कुक्कुट पक्षी नष्ट करण्याच्या कामास सकाळी साडे सातपासून सुरुवात झाली आहे.सकाळी सर्व पथकातील कर्मचाऱ्यांना पीपीई किट परिधान करून टॉमी फ्लूच्या गोळ्या घेऊन कलिंग करण्यासाठी पोल्ट्रीतील शेड मध्ये पाठवण्यात आले. एक किलोमीटर परिसरातील दीड लाख कुकुट पक्षी दोन दिवसात नष्ट करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाचे आहे. त्याच्या एक किलोमीटर परिसरातील १० पोल्ट्री फार्म मधील पाच लाख पक्षी अगोदर नष्ट केले जाणार आहेत.पोल्ट्री व्यवसायिक यांचे कोट्यवधीचे नुकसान होणार आहे. तर यावर अवलंबून असलेल्या उद्योगातील हजारो तरुण बेरोजगार होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.नवापूर मधील चार पोल्ट्री मधील कोंबड्यांना बर्ड फ्ल्यू झाल्याचे समोर आले त्यानंतर सुरू करण्यात आलेल्या किलिंग ऑपरेशन मध्ये काल दिवसभरात २०० पशुवैद्यकीय विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ४० हजार कोंबड्या नष्ट केल्यात आज कर्मचारी संख्या वाढल्याने दुप्पट कोंबड्या नष्ट केल्या जाणार आहेत. अगोदर चार पोल्ट्री मधील दीड लाख पक्षी नष्ट केले जातील. त्यानंतर एक किलो मिटर परिसरात येणाऱ्या पोल्ट्री मधील ४ लाख ९० हजार पक्षी नष्ट केलं जाणार आणि उर्वरित पक्ष्यांसंदर्भात पाठविलेले अहवाल आल्या नंतर निर्णय घेण्यात येणार आहेत .पहिल्या टप्प्यात जवळपास ६ लाख कोंबड्या नष्ट केल्या जातील तर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित ३ लाख कोंबड्या नष्ट केल्या जाणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारूड यांनी दिली.महसूल आयुक्तांची भेट व पाहणीनवापुरातील बर्ड फ्लू झालेल्या पोल्ट्रीची दुसऱ्या दिवशी नाशिक विभागाचे महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी भेट देऊन पाहणी केली व व्यावसायिक व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन समस्या जाणून घेतल्या. बर्ड फ्लू नियंत्रणासाठी योग्य कामगिरी करण्याचा सूचना केल्या.
बर्ड फ्लूनंतर व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, त्या अनुषंगाने शासननिर्णयानुसार मिळणारी नुकसान भरपाई तोडकी आहे, असे मत व्यावसायिकांनी मत व्यक्त केले आहे. कोंबड्यां सोबत अंडी आणि कोंबड्यांचे खाद्य नष्ट केले जात असल्याने होणारे नुकसान मोठे आहे. नवापूरमध्ये जवळपास करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. एकूणच पोल्ट्री व्यवसाय नष्ट होण्याचा मार्गावर आहे.बर्ड फ्ल्यू मुळे पोल्ट्री व्यसायिकाना कोट्यवधी चा फटका बसला असला तरी पशुसंवर्धन विभागाची अनास्था कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.