कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बँकेत ५० टक्के कर्मचारी उपस्थित राहत असल्याने पहिलेच ४० ते ५० गावांच्या मध्यवर्ती ठिकाणी बँकेची शाखा असल्याने येथे खातेदारांची प्रचंड गर्दी असते. त्यात विद्यार्थी खाते उघडण्यासाठी येत असल्याने त्यांना बँकेतून प्रतिसाद मिळत नाही. तसेच शेतीचे कामे सोडून पालकांना व बालकांना सातत्याने बँकेत चकरा माराव्या लागत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पालकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
बँकेत यापूर्वी सुवर्ण महोत्सव शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची खाती उघडण्यात आली आहेत. परंतु त्यामध्ये व्यवहार न झाल्याने, ती झिरो बॅलन्स ने उघडल्याने बंद पडली आहे. ती सुरू करण्यासाठी आधार कार्ड लिंक करताना विद्यार्थ्यांच्या बोटांचे ठसे मॅच होत नाही त्यामुळे खाते पूर्ववत सुरू होण्यासाठी असंख्य अडचणी निर्माण झाल्या आहेत.
प्रशासनाने मागवलेली विद्यार्थ्यांच्या बँकेच्या खात्याची माहिती वेळेवर देणे शाळा प्रशासनाला जिकरीचे ठरत आहे त्यामुळे यातून योग्य मार्ग काढण्याची मागणी मुख्याध्यापकांनी केली आहे.
विद्यार्थ्यांची खाते उघडण्यापेक्षा शासनाने ही रक्कम शाळेच्या मुख्याध्यापकांच्या खात्यावर जमा करावी, मुख्याध्यापकानी ती धनादेशद्वारे विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा केल्यास पालकांचा त्रास वाचेल. मुकेश पाटील, अध्यक्ष नंदुरबार जिल्हा मुख्याध्यापक संघ
सध्या बँकेत असणारी कर्मचारी संख्या, त्यात नियमित खातेदार, शेतकरी वर्ग यांची बँकेतील गर्दी त्यात विद्यार्थी, पालकांची खाते उघडण्यासाठी आधारकार्ड लिंक करण्याकरीता होणारी गर्दी व धावपळ पाहता शासनाने शाळेच्या खात्यावर रक्कम वर्ग करुन ती मुख्याध्यापकानी धनादेशद्वारे विद्यार्थी, पालक यांच्या खात्यावर जमा केल्यास अडचणी येणार नाहीत. - सुनील भामरे, अध्यक्ष नाशिक विभाग, राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळ, मुंबई