शेतकऱ्यांना सिंचनासाठी कयाधू नदीचे पाणी मुबलक प्रमाणात आहे; परंतु शेतकऱ्यांच्या ४० विद्युत मोटारी बंद असल्यामुळे हरभरा, ऊस, हळद, मका आदी पिके पाण्याअभावी सुकत आहेत. खरिपातील मुख्य पीक हरभरा फुलावर आहे. अशा वेळेस पाणी न दिल्यास शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येते. गत चार दिवसांपासून शेतकऱ्यांना होणारा विद्युत पुरवठा बंद असल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. विद्युत तारेची चोरी होऊन चार दिवसांचा कालावधी होत आहे, तरीसुद्धा विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध पोलिसांत अद्याप गुन्हा दाखल केला नाही, तसेच शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा सुरळीत केला नाही. यामुळे विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी व चोर यांच्यात संगनमत आहे की काय, असा संशय बोरगाव येथील उपसरपंच शंकरराव कदम यांनी व्यक्त केला आहे. वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बंद असलेला विद्युत पुरवठा तात्काळ सुरळीत करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
पाणी वाहते शेतात; पण विजेअभावी पिके धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:13 IST