शासनाने ऑनलाईन शिक्षणाची व्यवस्था केली आहे. परंतु ग्रामीण भागात ही योजना सपशेल अपयशी ठरली आहे. जेथे प्राथमिक गरजा नीटपणे भागात नाहीत तेथील पालकांना दहा बारा हजार रुपये किमतीचा स्मार्ट फोन कसा मिळेल जर मिळालाच तर ग्रामीण भागात नेटवर्क नसते. त्यामुळे शासनाची ऑनलाइन शिक्षण ग्रामीण भागात सपशेल अपयशी ठरले आहे.
ठरलेल्या वेळेत अभ्यास होमवर्क करून शाळेच्या वेळेत गडबड घाईघाईत शाळेत जाणारे चिमुकले पाटी पुस्तके अडगळीत टाकून मनसोक्तपणे विविध प्रकारचे खेळ खेळण्यात मग्न असल्याचे चित्र ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे. याचा दुष्परिणाम बालकांच्या भविष्यात होणार आहे. चिमुकल्याना शिक्षणापासून वंचित राहावे लागले आहे.
गेल्या सहा सात महिन्यापासून शाळा पूर्णपणे बंद असल्यामुळे पालक सुध्दा आपल्या पाल्याला अभ्यास करण्यासाठी तगादा लावला नाही. अथवा अभ्यासाबद्दल विचारणा केली नाही. कारण शाळाच बंद आहेत मग कुठला आणि कसला अभ्यास कराया लावणार? बहुतांश पालक आपापल्या कामात व्यस्त असतात तर अनेक पालक निरक्षर आहेत. शिक्षणाचा मुळ पाया प्राथमिक शिक्षण आहे. शिक्षण विभाग चिमुकल्याना पास करून पुढच्या वर्गात प्रवेश देईल यात काही वाद नाही परंतु झालेले शिक्षणाचे नुकसान कसे भरून काढणार ? असा प्रश्न उपस्थित होत आहे . त्यावर शिक्षण विभाग काय मार्ग काढणार या कडे पालकांचे लक्ष लागून आहे.