मालेगाव : मानवी जीवनात सज्जनांच्या सहवासाचे महत्त्व खूप आहे. सज्जनांचा सहवास प्राप्त झाला की, मानवाच्या जीवनाचे सोने होऊन मनातील षडविकारही नाहीसे होतात. मानवाला सज्जनांची संगत सहवास मिळाला तर उत्तम कार्य करण्याची ऊर्जा प्राप्त होते, असे प्रतिपादन शिवकीर्तनकार प्रा. धाराशिव शिराळे यांनी मालेगाव येथे अपरंपार स्वामी भक्त मंडळच्या वतीने अंखड शिवनाम सप्ताहात केले.
हे सप्ताहाचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. पुढे बोलताना शिराळे म्हणाले की, संस्कारांमुळे आपण घडतो आपल्यातील षडविकार नष्ट होतात व आपले कल्याण होते ते केवळ संतांच्या सहवासाने मानवी जीवनात संकटे आली तर त्या संकटांवर आपण धैर्याने मात करू शकतो, ते धैर्य सज्जन व्यक्ती आपणास त्यांच्या ज्ञानदानातून देत असतात. सज्जनांचा सहवास आपणास घडावयाचा असेल तर अंत:करणातून परमेश्वराची प्रार्थना करणे अपेक्षित आहे, असे ते प्रवचनात म्हणाले. परमेश्वराची प्रार्थना करणे म्हणजे कर्मकांड नाही तर अंतकरणातून नामस्मरण करणे होय. नामस्मरणाने जीवनातील संकटे नष्ट पावतात, तसेच सुंदर विचारांचे बीजारोपण आपल्या मनात होत असते इतरांविषयीचा क्रोध मावळतो व सर्वाभूती समभाव आपल्यामध्ये निर्माण होतो तेव्हा सज्जनांचा सहवास व परमेश्वराचे नामस्मरण आपण जर केले तर या दुःखरूपी जीवनातून आपण तरून जाऊन सुख, ज्ञान, धन व उत्तम आरोग्य प्राप्त होते, असे ते म्हणाले.
राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य स्वामी, गुरुवर्य१०८ करबसव शिवाचार्य स्वामीजी यांच्या कृपाशीर्वादाने व प्रेरणेने मालेगाव, ता. अर्धापूर येथे परमरहस्य पारायण सोहळा तसेच कीर्तन, प्रवचन, भजन आदी समारंभाचे आयोजन मागील २४ वर्षांपासून केले जात आहे. या निमित्ताने महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार प्रवचनकार गायक-वादक आपली सेवा देत आहेत. कोरोना काळातील सर्व नियम पाळून पारायण सोहळा संपन्न होत आहे. सकाळी रुद्राभिषेक, शिवपाठ, नंतर परमरहस्य पारायण, भजन रात्री शिवकीर्तन या सर्व कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.