कोंबून प्रवासी भरलेल्या वाहनाकडे पोलिसांचे दुर्लक्ष
माहूर : माहूर तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्वच रस्त्यावर अवैध वाहतूक सर्रासपणे सुरू असून त्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे .पोलीस प्रशासन आणि नियमबाह्य खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांचे सबंध इतके मधुर आहेत की जणूकाही वाहतूक पोलिसांकडुन खाजगी वाहतूकदारांना कोणताही धोका होऊ शकणार नाही असे चित्र दिसून येत आहे.
माहूर तालुक्यातील ग्रामीण भागात राज्य परिवहन महामंडळ कडून होत असलेल्या वाहतूक सेवेत योग्य नियोजन नसल्याचा फायदा खाजगी प्रवासी वाहतुकदारांना होत आहे. बसची अपुरी संख्या प्रवाशाच्या सोयीनुसार बसची सेवा नसणे आणि तीन - चार तास एकही बस नसणे तर दिवसभरातून केवळ एकदाच बस असणे असे प्रकार ग्रामीण भागात असल्याने प्रवासी वैतागून खाजगी वाहतुकीकडे वळतात बसस्थानक परिसररात खाजगी प्रवासी वाहतुकदारांचा गराडा असतो. दलाल बसस्थानकातून प्रवासी पळवतात प्रवाश्यांच्या दृष्टीने सोयीची वाटणारी खाजगी प्रवासी वाहतूक धोकादायकही आहे.माहूर तालुक्यात सर्वच ग्रामीण भागात अवैध प्रवासी वाहतुकीने कळस गाठला असून प्रवासी कोंबून भरलेले असतात. एक एका रिक्षामध्ये दहा पेक्षा अधिक तर टॅक्सी किंवा ऑटोरिक्षात पंधरा ते वीस जण बसलेले असतात. वाहनांची तपासणी होणार असल्याने चालकांना आधीच कळलेले असते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नियमित पणे तपासणी मोहीम सुरू केल्यास माहूर तालुक्यातील अवैध प्रवासी वाहतुकीला आला बसू शकेल.
कुपटी ते इवळेश्वर मार्गे माहूर, वानोळा ते राजगड, दिगडी (धा.) ते वानोळा मार्गे माहूर, वानोळा ते फुलसावंगी, वाई बा.ते माहूर या मार्गावर मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी असून प्रमाणापेक्षा अधिक प्रवासी बसवून ही वाहतूक केली जाते अनेकदा प्रवासी थेट टॅक्सीला मागे लटकून किंवा टपावर बसवून वाहतूक होताना दिसते. यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे यदाकदाचित अपघात झाला तर सबंधिताकडून कार्यवाहीचे नाटक होते त्यानंतर जैसे थे चे चित्र पहावयास मिळते.
माहूर तालुक्यातील ग्रामीन भागात होत असलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालून सबंधित वाहन चालकांवर कार्यवाही करावी अशी मागणी जोर धरत आहे.