जनावरांवर ताव; दोन जनावरांचा खात्मा
बारड : शेंबोली, वैजापूर पार्डी शिवारात बिबट्याचा वावर असल्याने याठिकाणी बिबट्याकडून आखाड्यावरील जनावराचा खात्मा करून शिकारीवर ताव मारण्याचा कार्यक्रम जोरदारपणे सुरू आहे. बिबट्याच्या वावराने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्या या शिवारामध्ये वावरत असून बारड, गोबरा तांडा, नागेली, वैजापूर पार्डी, शेंबोली, डोंगरगाव शिवारात शेतकऱ्यांच्या आखाड्यावरील जनावरांची शिकार करून खात्मा केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. वन विभागाने प्रत्येक ठिकाणी जाऊन पंचनामा करून कारवाई केली. २६ रोजी शेंबोली शिवारातील माधवराव शंकरराव भोसले या शेतकऱ्याच्या आखाड्यावरील रेड्याचा पडशा पाडल्याची घटना घडली आहे, तर वैजापूर पार्डी येथील शेख पाशामिया रसुलसाब यांच्या शेतातील आखाड्यावर वगाराचा फडशा पाडला असल्याची घटनाही याठिकाणी घडली आहे. सततच्या बिबट्याकडून होणाऱ्या शिकारीमुळे शेतकरी परेशान झाला असून, वन विभागाकडून फक्त पंचनामा होतो; परंतु त्याचा मोबदला लवकर मिळत नसल्याने शेतकऱ्यांकडून याबाबत खंत व्यक्त करण्यात येत आहे.
दोन्ही घटनांचा पंचनामा वनपाल पांडुरंग धोंडगे, वनरक्षक गणेश घुगे यांनी केला आहे. या ठिकाणी बिबट्याच्या पंजाचे ठसे आढळून आले आहेत.