यांचे आवाहन
नांदेड : शासकीय कार्यालय, मोठ्या इमारती व इतर सार्वजनिक ठिकाणी आगीसारख्या घडणाऱ्या घटना विशेष काळजी घेतील तर निश्चित टाळण्यासारख्या असतात. अशा घटना टाळण्यासाठी त्या-त्या कार्यालयप्रमुखांनी, इमारतीच्या मालकांनी अथवा भोगवटादार यांनी वेळीच अग्निशामक प्रतिबंधक उपाययोजनेंतर्गत असलेल्या निर्देशाचे पालन करून दरवर्षी नित्यनियमाने ॲडिट करून घेणे बंधनकारक आहे. महाराष्ट्र शासनाने यासंदर्भात ६ डिसेंबर २००८ पासून महाराष्ट्र आग प्रतिबंधात्मक आणि जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम, २००६ याची अंमलबजावणी निश्चित केली आहे. या अधिनियमानुसार दिलेल्या निर्देशाचे सर्व कार्यालयप्रमुख व सार्वजनिक ठिकाणी असलेल्या मोठ्या इमारती, सार्वजनिक उपक्रम ज्या ठिकाणी होतात त्या इमारतींच्या मालकांनी, भोगवटाधारकांनी पालन करून कोणत्याही अपघाताबाबत त्रुटी राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.
अग्निशमन सुरक्षा आणि महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ बाबत मंगळवारी बचत भवन येथे जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुखांची बैठक जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी (रोहयो) अनुराधा ढालकरी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, मनपाचे अग्निशमन विभागाचे प्रमुख रईश पाशा व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
प्रत्येक कार्यालयप्रमुखांनी आपल्या कार्यालयातील विद्युत उपकरणांची सुरक्षितता व महाराष्ट्र आगप्रतिबंधक व जीवरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ व नियम २००९ अंतर्गत दिलेल्या निर्देशाचे पालन व उपाययोजना करून घेतल्या पाहिजेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने एकदा इमारत बांधून संबंधित विभागांना ती इमारत हस्तांतरित केल्यास त्याच्या संपूर्ण देखभाल, दुरुस्ती आणि सुरक्षिततेची जबाबदारी ही संबंधित कार्यालयप्रमुखाची असते हे लक्षात घ्या, असेही जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले. या बैठकीत रईश पाशा यांनी अधिनियमातील तरतुदीबाबत सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली.