शंकरनगर परिसरात बहुतांश शेती कोरडवाहू आहे. त्यामुळे नैसर्गिक पावसावरच शेतकऱ्याची भिस्त आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा मात्र पावसाने कहरच केला संततधार पावसाने खरीप हंगामातील सर्वच पिकांची वाट लागली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. मुबलक प्रमाणात पाऊस झाला असल्याने जमिनीत ओलावा कायम होता. त्यामुळे मूग, उडीद व सोयाबीनच्या रानात ज्वारी, करडी व हरभऱ्याची पेरणी मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. हरभरा पिकासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
विजेअभावी पिके धोक्यात
हदगाव : बोरगाव (हस्तरा) येथील ११ केव्हीची विद्युत तार अज्ञात चोरट्यांनी २२ रोजी रात्री चोरून नेली. यामुळे बोरगाव हस्तरा येथील चार रोहित्रे बंद पडली आहेत. त्यामुळे शेतात पाणी वाहत असूनही विजेअभावी पिके धोक्यात आली आहेत.
शेतकऱ्यांना सिंचनासाठी कयाधू नदीचे पाणी मुबलक प्रमाणात आहे; परंतु शेतकऱ्यांच्या ४० विद्युत मोटारी बंद असल्यामुळे हरभरा, ऊस, हळद, मका आदी पिके पाण्याअभावी सुकत आहेत. खरिपातील मुख्य पीक हरभरा फुलावर आहे. अशा वेळेस पाणी न दिल्यास शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येते. गत चार दिवसांपासून शेतकऱ्यांना होणारा विद्युत पुरवठा बंद असल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. विद्युत तारेची चोरी होऊन चार दिवसांचा कालावधी होत आहे, तरीसुद्धा विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध पोलिसांत अद्याप गुन्हा दाखल केला नाही, तसेच शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा सुरळीत केला नाही. यामुळे विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी व चोर यांच्यात संगनमत आहे की काय, असा संशय बोरगाव येथील उपसरपंच शंकरराव कदम यांनी व्यक्त केला आहे. वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बंद असलेला विद्युत पुरवठा तात्काळ सुरळीत करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
तालुका महासचिवपदी नरवाडे
हिमायतनगर : वंचित बहुजन आघाडीच्या तालुका महासचिवपदी विलास नरवाडे धानोरकर यांची, तर अध्यक्षपदी डाॅ. रविराज दुधकावडे यांची निवड करण्यात आली. वंचित आघाडीचे प्रणेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या स्वाक्षरीचे पत्र डाॅ. दुधकावडे यांना नुकतेच प्राप्त झाले आहे.
तालुक्याच्या इतर कार्यकारिणीत तालुका उपाध्यक्ष शेख खयुम शेख इब्राहिम, बळीराम काळे, वैजनाथ पांचाळ, संतोष खिल्लारे, गणेश सूर्यवंशी, सचिवपदी गंगाधर वाघमारे, सहसचिव शुभम नरवाडे, संघटक डाॅ. मनोज राऊत, आयटी प्रमुख अमोल वाडेकर, प्रवक्ता हर्षवर्धन हणवते, प्रसिद्धी प्रमुख कपिल वाठोरे, शहर अध्यक्ष सलीम खान मेहबूब खान पठाण, सल्लागार चंद्रकांत काळबांडे, वैभव नरवाडे, सदस्य अरुण सावते, संभाजी राऊत, सिद्धार्थ हणवते, प्रमोद राठोड आदींचा समावेश आहे. वंचित आघाडी निवड प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी स्वतःच निवड करून त्यांच्या स्वाक्षरीनेच निवडपत्र दिले. नवीन कार्यकारिणीत यंग ब्रिगेडला प्राधान्य दिल्याने येणाऱ्या नगरपंचायत व ग्रामपंचायत निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून येण्याची संभावना आहे. नूतन कार्यकारिणीचे सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे.