लोकमत न्यूज नेटवर्क
अर्धापूर : अर्धापूर तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींच्या ३७७ जागांसाठी दिनांक १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास बुधवार, २३ डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. पहिला व दुसरा दिवस निरंक गेला असला तरी सोमवारी तिसऱ्या दिवशी ११ ग्रामपंचायतींमधून ४६ अर्ज दाखल झाले आहेत. त्यासाठी तहसील कार्यालयातील इच्छुकांसह समर्थकांची एकच गर्दी झाली होती.
दिनांक ३० डिसेंबरपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर ऑफलाईन कागदपत्र जमा केले जाणार आहेत. त्यासाठी निवडणूक कार्यक्रमाच्या अनुषंगाने निवडणूक विभागाने तयारी केली आहे. यासाठी पंचवीस ते तीस कक्ष तयार करण्यात आले असून, शंभर ते दीडशे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये १२ निवडणूक निर्णय अधिकारी, १२ सहाय्यक निवडणूक अधिकारी आदींची निवड करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी दाखल अर्जांची ३१ डिसेंबरला छाननी होणार आहे. दरम्यान, ४ जानेवारीपर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेता येणार आहेत.
३७७ सदस्यांसाठी ४६ अर्ज दाखल
सोमवारी ११ ग्रामपंचायतींसाठी ४६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये मेंढला बु.- ८, शहापूर-अमरापूर-हमरापूर ६, गणपूर ४, कामठा बु. २, सांगवी खु./ खडकी ५, दाभड १, शेलगाव बु. ९, शेलगाव खु. २, शेणी २, देळुब खु. ५, निमगाव २ असे एकूण ४६ अर्ज दाखल झाले आहेत.