भविष्यात मोठ्या दुर्घटनेची शक्यता
२५० कोटी रुपये खर्चून बांधलेला बाभळी बंधारा; सात वर्षांतच लागली वाट
धर्माबाद : बहुचर्चित धर्माबाद तालुक्यातील बाभळी बंधाऱ्याच्या सुरक्षा बांधाला भेगा पडण्याबरोबरच बंधाऱ्याच्या गेट क्र. ८ च्या पायाला मोठे भगदाड पडल्याने गेट बंद असूनही खालच्या बाजूने मोठा पाण्याचा प्रवाह सुरू आहे. हा बंधारा २५० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला आहे. सात वर्षांतच बाभळी बंधाऱ्याच्ळा सुरक्षा बांधाला व बंधाऱ्यावरील रस्त्याला मोठे भगदाड पडल्याने भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.
तत्कालीन आंध्र प्रदेश व आताचे तेलंगणा आणि महाराष्ट्र राज्यातील वादाने गाजलेला बहुचर्चित बाभळी बंधारा हा तेलंगणा सीमेपासून अवघ्या सात किलोमीटर आत महाराष्ट्र राज्याच्या हद्दीत धर्माबाद तालुक्यातील बाभळी येथे बांधण्यात आला. सन २०१३ रोजी बंधारा पूर्ण झाला. सात वर्षांतच बंधाऱ्याची दुरवस्था झाली आहे.
बाभळी बंधाऱ्याची क्षमता २.७४ टीएमसी एवढी आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २९ ऑक्टोबर रोजी बाभळी बंधाऱ्याचे दरवाजे बंद करण्यात आल्याने बंधाऱ्यात आजघडीला मुबलक पाणीसाठा आहे. बाभळी बंधाऱ्यावर राज्य शासनाने २५० कोटी रुपये खर्च केले. गत सात वर्षांपूर्वी उद्घाटन झालेल्या बंधाऱ्याची प्रशासनाकडून योग्य देखभाल होत नसल्याने मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. दोन राज्यांच्या वादात गुत्तेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे सात वर्षांतच सुरक्षा बांधाला भेगा पडल्या आहेत.
प्रशासनाकडून योग्य देखभाल होत नसल्याने गेट क्र. आठच्या पायथ्याशी मोठे भगदाड पडले असून, तेथून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रवाह सुरू आहे. हे भगदाड भविष्यात मोठे झाल्यास बाभळी बंधाऱ्यावर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, तसेच बाभळी बंधाऱ्याच्या सुरक्षा बांधालाही तीन फुटांपर्यंत भेगा पडल्याने भविष्यात या भेगांची खोली वाढली तर बांध फुटून बंधाऱ्याखालील गावांना धोका पोहोचण्याची शक्यता आहे.
बाभळी बंधाऱ्याची सुरक्षा वाऱ्यावर
दोन राज्यांतील वादाने बहुचर्चित असलेल्या बाभळी बंधाऱ्याची सुरक्षा मात्र वाऱ्यावर आहे. बंधाऱ्याचे, तसेच पाटबंधारा विभागाचे सक्षम अधिकारी दररोज उपस्थित राहत नसल्याचे दिसते. डे-नाईट एकच वाॅचमन बाभळी बंधाऱ्याची अल्प मानधनावर सुरक्षा करीत आहे. बंधाऱ्याला जाणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणावर काटेरी झुडपे वाढली आहेत. या झाडा-झुडपांची मुळे बंधाऱ्यात शिरून भविष्यात दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारने बंधाऱ्याची सुरक्षितता व सद्य:स्थितीतील बंधाऱ्याच्या परिस्थितीवर उच्चस्तरीय समिती नेमून आवश्यक त्या उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
प्रतिक्रिया-----------
याबाबत बाभळी बंधाऱ्याचे शाखा अभियंता एस.बी. देवकांबळे यांना विचारणा केली असता ते म्हणाले, बाभळी बंधाऱ्याच्या सुरक्षा बांधाला, तसेच रस्त्याला भेगा पडल्या आहेत, तसेच गेट क्र.८ च्या दरवाजामधील बुशमधील रबर निघाल्याने पाण्याचा प्रवाह सुरू आहे. याबाबत संबंधित कंत्राटदाराला सूचना दिली असून, लवकरच त्याच्या दुरुस्तीचे काम होईल.