सुनील चौरे , हदगाव तालुक्यातील २८२ अंगणवाड्या व ८२ मिनी अंगणवाड्यांपैकी १६ अंगणवाड्यांची निवड आयएसओ मानांकनासाठी करण्यात आली, मात्र लोकसहभाग मिळत नाही. शासन स्तरावरुन निधी नाही, अधिकारी, कर्मचारी यासाठी झटत नाहीत, त्यामुळे या कामाला खीळ बसल्याचे चित्र तालुक्यात आहे. जिल्ह्यात कुपोषणमुक्तीचा खूप गाजावाजा झाला, राज्यात नांदेडचे तोंडभरुन कौतुक झाले. त्यामुळे या विभागाला मूठभर मांस आलं आणि बळही मिळालं. त्याचं पुढचं पाऊल म्हणून अंगणवाडी हायटेक करण्यासाठी तालुक्यात १६ अंगणवाड्यांची प्राथमिक स्वरुपात आयएओ मानांकनासाठी निवड झाली, काम जोरात सुरु असतानाच अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनिसांनी मानधनाच्या मागणीसाठी अंगणवाडीला ताळे ठोकले. त्यानंतर अधिकारी, कर्मचारी लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागले. यामुळे या कामाला खीळ बसल्याचे सांगण्यात येते. मात्र वस्तुस्थिती वेगळी आहे. या अंगणवाड्या हायटेक करण्यासाठी गावातील प्रतिष्ठित मंडळी, दानशूर मंडळींनी मोकळ्या हाताने मदत करायची आहे, मात्र ही मदत होत नाही. ज्या अंगणवाड्यामध्ळे आपल्याच गावातील, समाजातील मुल शिकतात, शालेय शिक्षणापूर्वीचे धडे घेतात, त्यांची काय दशा आहे. त्यांना पोषक आहार मिळतो काय? प्रगत समाजाप्रमाणे त्याला शुद्ध पाणी, इंग्रजीचे ज्ञान,संगणकाचे ज्ञान मिळावे, यासाठी गावातील प्रतिष्ठित मंडळींनी लक्ष देणे आवश्यक आहे. लोक उदासीन आहे. चित्राच्या माध्यमातून विद्यार्थी भाषा शिकतो, त्यामुळे अंगणवाडीला रंगरंगोटी, किचनओटा, प्रसन्न वातावरण, पिण्याचे शुद्ध पाणी, स्वच्छता या बाबी महत्त्वाच्या ठरतात, यासाठी गावातून लोकसहभाग मिळवून या अंगणवाड्या आयएओसाठी तयार करायच्या आहेत. मात्र १६ पैकी ८ अंगणवाड्यांची ५० ट्के तयारी झाल्याची माहिती मिळाली. एका अंगणवाडीसाठी १ ते दीड लाख रुपये खर्च लागतो, मात्र एवढा निधी गावातून उभा राहत नाही, त्यामुळे कर्मचारी हताश झाले आहेत. १६ अंगणवाड्यांमध्ये अंबाळा, बाभळी, तामसा, केदारनाथ, दिग्रस, पाथरडतांडा, निवघा बाजार, काळेश्वर, महातळा, तळणी, हडसणी, ल्याहरी, बामणी, पळसा, खैरगाव, चाभरा तांडा यांचा समावेश आहे. निधी उभा करण्यासाठी गावातील सामाजिक भान असणार्यांची मदत मिळते, मात्र त्यासाठी ग्रामस्थ व अधिकारी किंवा कर्मचारी यांचा समन्वय अतिआवश्यक आहे. कागदी घोडे नाचविण्यात पटाईत असणारे अधिकारी याकडे दुर्लक्ष करतात तर विकासाच्या गप्पा करणारे लोकप्रतिनिधींना छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ नाही. लक्ष देणे आवश्यक अंगणवाड्या हायटेक करण्यासाठी गावातील प्रतिष्ठित मंडळी, दानशूर मंडळींनी मोकळ्या हाताने मदत करायची आहे, मात्र ही मदत होत नाही. ज्या अंगणवाड्यामध्ये आपल्याच गावातील, समाजातील मुल शिकतात, शालेय शिक्षणापूर्वीचे धडे घेतात, त्यांची काय दशा आहे. त्यांना पोषक आहार मिळतो काय?प्रगत समाजाप्रमाणे त्याला शुद्ध पाणी, इंग्रजीचे ज्ञान, संगणकाचे ज्ञान मिळावे, यासाठी गावातील प्रतिष्ठित मंडळींनी लक्ष देणे आवश्यक आहे.
अंगणवाडीला खीळ
By admin | Updated: May 11, 2014 00:25 IST