देगलूर : सर्व बँकांना सलग तीन दिवस सुट्या आल्याने ग्राहकांसाठी या दिवसांत किमान एटीएम सुविधा उपलब्ध ठेवावी, याचे भान बँक व्यवस्थापनास राहिले नाही, असे स्पष्टपणे दिसून येत आहे.
देगलूर शहरात राष्ट्रीयीकृत, सहकारी बँकांच्या शाखा मोठ्या संख्येने आहेत. सर्वच बँकांचे व्यवस्थापक आपला कारभार वाढविण्यासाठी नागरिकांना ठेवी ठेवण्यासाठी विनवणी करतात आणि अशाप्रसंगी त्यांची गैरसोय होते. याकडे दुर्लक्ष केले जाते. या आठवड्याच्या शेवटच्या दिवसात सलग तीन दिवस सर्व बँकांचे व्यवहार बंद होते. साहजिकच पैसे काढण्यासाठी ग्राहकांंची एटीएमकडे गर्दी झाली. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मोंढा कॉर्नर आणि मार्केट यार्ड शाखेचे दोन्ही एटीएम शुक्रवार व शनिवार या दोन्ही दिवशी बंद होते. महाराष्ट्र बँकेचे एटीएम सुरळीत अवस्थेत नव्हते. यामुळे ग्राहकांना पैैसे काढण्यासाठी गाव प्रदक्षिणा करावी लागलीच, शिवाय कोठेच काही हाती लागले नाही म्हणून मनस्तापाला सामोरे जावे लागले. राष्ट्रीयीकृत बँकेत गेल्यानंतर काम वेळेवर होईल, यापेक्षा सौजन्याची वागणूक मिळेल की नाही, याची भीती वाटते. राष्ट्रीयीकृत बँकेतील पासबुक प्रिंटर मशीन का चालू नाही या प्रश्नावर संबंधित कंपनीच्या अभियंत्यास कळविले आहे, असे ठरावीक साचाचे उत्तर अनेक महिन्यांपासून ऐकविले जात आहे.