रविवारी पहाटेच तहसील कार्यालयाचे पथक जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण व तहसीलदार किरण अंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईसाठी गेले. दोन पथकांची यासाठी स्थापना करण्यात आली होती. नायब तहसीलदार महसूल मुगाजी काकडे यांच्या नेतृत्वातील पथक क्रमांक १ गोवर्धन घाट व कौठा नदीपात्रात दाखल झाले. नदीच्या दोन्ही बाजूने २ वेगवेगळी पथके बोटीसह नदीत दाखल झाली. यावेळी पथकात महसूल कर्मचारी व पुरेसा पोलीस बंदोबस्त असल्यामुळे कारवाईला सुरुवात झाली. सदर पथकाने गोवर्धन घाट व उर्वशी घाट येथे ८९ तराफे, कौठा व असर्जन येथे १२२ तराफे, हसापूर व कोटतीर्थ येथे ३४, असे २४५ तराफे मजुरांच्या साहाय्याने जाळून नष्ट केले. दोन्ही बाजूने वेगवेगळी पथके व नदीमध्ये बोटीवर १ फिरते पथक असल्यामुळे वाळूमाफियांना तराफे पळवून नेता आले नाहीत.
या कारवाईत नांदेड तहसीलचे मंडळ अधिकारी खुशाल घुगे, चंद्रशेखर सहारे, बालाजी जेलेवाड, चंद्रकांत कंगळे, अनिल धुळगंडे, अनिरुद्ध जोंधळे, तलाठी मनोज देवणे, सचिन नरवाडे, ईश्वर मंडगीलवार, कैलास सूर्यवंशी, विजय रणवीरकर, रवी पल्लेवाड, विजय अहिरराव व मंगेश वांगीकर, महिला तलाठी मीरा चिदगिरे, रेखा राठोड, चालक शेख जहिरोद्दीन आदींचा सहभाग होता. वजिराबाद ठाण्याचे उपनिरीक्षक रब, ग्रामीण ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक रोहिणी नपते यांचाही सहभाग होता.
महसूल विभाग सध्या ग्रा. पं. निवडणुकीच्या कामात व्यस्त असला तरी वाळूच्या अवैध उत्खनन व वाहतुकीवर लक्ष ठेवून आहे. त्यांच्यावर वेळोवेळी फौजदारी व दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे तहसीलदार किरण अंबेकर यांनी स्पष्ट केले.