कंधार : गत ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून विहित रितीने व विहित मुदतीत निवडणूक खर्चाचा हिशोब सादर केला नाही. तालुक्यात अशा १२४ जणांंना ५ वर्षाकरिता ग्रा.पं.निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्यात आले. त्यात पुरूषांपेक्षा महिलांची संख्या जवळपास दुप्पट असल्याचे समोर आले आहे. आता सुरु असलेल्या ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेत महिलेसाठी आरक्षित जागेवर उमेदवारी देताना गावपुढाऱ्यांची कसोटी लागत असल्याचे ग्रामीण भागातील चित्र आहे.
ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीने निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर निवडणूक खर्चाचा हिशोब विहित रितीने व विहित मुदतीत दाखल करावे लागते. परंतु तसे केले नाही तर ग्रामपंचायत सदस्य राहण्यास किंवा सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविले जाते. गत निवडणुकीतील तालुक्यातील २७ गावातील १२४ उमेदवारांनी खर्चाचा हिशोब वेळेत दाखल केला नाही. त्यामुळे त्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. त्यात पुरूष संख्येपेक्षा जवळपास दुप्पट संख्या महिलांची आहे.
१२४ अपात्र जणाची गावनिहाय अशी आहे. दाताळा -२ ,वरवंट -१ ,चौकीमहाकाया -१ ,मानसिंगवाडी -७ ,कळका -१ ,महालिंगी -१ ,देवयाचीवाडी -७ ,नंदनवन -९, हटक्याळ -५ ,शिर्शी बु. -६ ,कौठा -७ ,मरशिवणी -१ ,आंबुलगा -२ ,कुरूळा -१ ,गोणार -३ ,शिराढोण -१ ,जाकापूर- ७ ,वहाद-१० ,लाठ खु.-९ ,पेठवडज -६ ,बहाद्दरपूरा -१ ,काटकंळबा -१० ,बाचोटी -१ ,वाखरड-४, नावंदयाचीवाडी -७ ,भुत्याचीवाडी -५ ,उस्माननगर -९ आदींचा समावेश आहे.
अपात्र ठरविल्याने निवडणुकीची फेर राजकीय आखणी
आपल्या गटातील उमेदवार अपात्र ठरल्याने आताच्या राजकीय स्थितीची फेर आखणी करण्याचा प्रसंग गावच्या प्रस्थापित पुढाऱ्यांवर ओढवला आहे. काटकंळबा ,उस्माननगर ,पेठवडज ,वहाद ,कौठा आदी गावातील निवडणुका अतिशय चुरशीच्या ठरतात. गावची सत्ता ताब्यात घेण्यासाठी गत काही दिवसापासून राजकीय डावपेच आखले जात होते. त्यानुसार वॉर्डातील उमेदवारी निश्चित केली जात होती. परंतु अपात्रतेचा निर्णय धडकताच नवीन समीकरणे जुळवावी लागत असल्याचे चित्र आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत गावपुढारी आपल्या वॉर्डातील राजकीय दबदब्यासाठी महिलांच्या आरक्षित जागेवर कुटुंबातील महिलांना उमेदवारी देतात. आणि सत्तेचा मार्ग सोपा करतात. मात्र अपात्रतेत महिलांची संख्या अधिक असल्याने पुढाऱ्यांची मोठी गोची झाली आहे. काहींनी गतवेळा पराभव स्वीकारत या निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी खटाटोप चालविला होता. काहींना सलग विजयाची आशा होती. परंतु अपात्रतेमुळे अपेक्षाभंग झाला आहे. त्यामुळे नव्या राजकीय समीकरणाची जुळवणी करावी लागत असल्याचे ग्रामीण भागातील चित्र आहे.