धामणा : ताेल गेल्याने तरुण विहिरीत पडला आणि त्यातच त्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना कळमेश्वर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील १४ मैल ते व्याहाड मार्गावरील लेआउटमध्ये बुधवारी (दि. १८) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली.
चंदू मुरारीलाल शर्मा (वय २७, रा. डाॅ. आंबेडकरनगर, आठवा मैल) असे मृताचे नाव आहे. १४ मैल ते व्याहाड मार्गालगत असलेल्या लेआऊटमध्ये चंदूच्या काकाचा भूखंड आहे. त्या भूखंडावर विहीरदेखील आहे. ताे बुधवारी सायंकाळी या प्लाॅटवर आला हाेता. त्यानंतर त्याचा मृतदेह या विहिरीत तरंगताना आढळून आला. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह बाहेर काढला व उत्तरीय तपासणीसाठी कळमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. ताे ताेल गेल्याने विहिरीत पडला असावा; तसेच पाेहता येत नसल्याने व वेळीच मदत न मिळाल्याने त्याचा विहिरीत बुडून मृत्यू झाला, अशी माहिती पाेलिसांनी दिली. या प्रकरणी कळमेश्वर पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला आहे.