पालकमंत्री नितीन राऊत यांचा मानस : मेट्रो रेल्वे, मिहानला गती नागपूर : राज्य शासनाच्या माध्यमातून मेट्रो, मिहान, अॅडव्हान्टेज विदर्भ, रस्ते, उड्डाणपूल विविध प्रकल्पांच्या माध्यमातून नागपूर शहराचा झपाट्याने विकास होत आहे. येत्या काळात नागपूरला ‘वर्ल्ड क्लास सिटी’ करण्यावर भर दिला जाईल, असा मानस पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला. स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात पालकमंत्री राऊत यांनी नागपूर शहराच्या विकासाचे व्हिजन मांडले होते. त्याबद्दल लोकमतशी बोलताना राऊत म्हणाले, नागपुरात लवकरच मेट्रो रेल्वे धावणार आहे. या प्रकल्पाला राज्य सरकारने मंजुरी दिली. मंत्रिमंडळात पुणे मेट्रोचा विषय मंजूर होत असताना, आपण पुढाकार घेऊन नागपूर मेट्रोचा विषयही मंजूर करून घेतला. एवढेच नव्हे तर केंद्र सरकारकडे सुधारित आराखडा पाठविण्यासाठी आपण केलेल्या विनंतीवरून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बैठक घेतली. तीत मुख्यमंत्र्यांसह मुख्य सचिव, अप्पर मुख्य वित्त सचिव यांनी एकावेळी स्वाक्षरी केल्या. त्यामुळेच प्रस्ताव केंद्र सरकारकडे दिल्ली येथे पाठविता आला. आता केंद्रीय मंत्रिमंडळही त्या प्रस्तावाला मंजुरी देणार आहे. त्यामुळे नागपूरकरांना सक्षम, प्रभावी व स्वस्त अशी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध होणार आहे. हे काही एका दिवसांत झालेले नाही. त्यासाठी गेल्या वर्षभराचे परिश्रम लागले आहे, असेही त्यांनी सांगितले. महामार्गाच्या विकासामध्येही राज्य सरकारची महत्त्वाची भूमिका आहे. भंडारा रोड, चंद्रपूर रोड आणि छिंदवाडा रोड या महामार्गाचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे. भारत सरकारच्या भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग विकास विभागातर्फे २३ जुलै २०१४ च्या पत्रान्वये कामठी रोडवरील एलआयसी चौक ते कडबी चौक आणि आॅटोमोटिव्ह चौक ते टेकानाका हे दोन उड्डाणपूल बांधण्यात येणार असून, त्यासाठी १७५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असल्याचे पालकमंत्री राऊत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
नागपूरला करणार ‘वर्ल्ड क्लास सिटी’
By admin | Updated: August 20, 2014 01:09 IST