कोंढाळी : बँक ही आज अत्यावश्यक सेवा झाली आहे; पण केंद्र शासनाने निर्देश देऊनही राज्य शासनाने बँकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा दिलेला नाही. त्यामुळे बहुतांश बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण होऊ शकले नाही.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांचे जीव धोक्यात आले आहे. कोंढाळी या २० हजार लोकसंख्येच्या गावात बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. या बँकेत शाखा व्यवस्थापकासह एकूण १२ कर्मचारी आहेत. त्यातील पाच कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. मात्र या कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा न दिल्याने फक्त तीन वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण झाले आहे. अनेक तरुण अधिकारी व कर्मचारी जीव धोक्यात घालून कोरोनाच्या संकटकाळात दररोज हजारो नागरिक, व्यापारी, शेतकरी व वयोवृद्ध लोकांना बँकिंग सेवा देत आहेत. नागपूर विभागात आतापर्यंत बँक ऑफ इंडियाच्या सात अधिकारी आणि कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यातील पाच लोकांचे वय ४० च्या जवळपास होते. मात्र फ्रंटलाईन वर्कर नसल्याने त्यांचे लसीकरण होऊ शकले नव्हते. त्यामुळे राज्य सरकारने आता तरी बँक कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन त्यांचे तातडीने कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण करावे अशी मागणी होत आहे.