विजय नागपुरे
लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : कळमेश्वर-गाेंडखैरी मार्ग नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गाला जाेडणारा असून, हा मार्ग पुढे मध्य प्रदेशाला जाेडला आहे. शिवाय, कळमेश्वर परिसरात औद्याेगिक वसाहतही आहे. त्यामुळे या मार्गावर २४ तास वाहनांची वर्दळ असते. नागपूर-दिल्ली रेल्वेमार्ग कळमेश्वर-गाेंडखैरी मार्गाला छेदून गेला असून, या मार्गावरील रेल्वे फाटकाजवळ दिवसभर वाहतूक काेंडी हाेते. ही काेंडी अपघातांना कारणीभूत ठरत असून, येथे ‘ओव्हरब्रीज’ची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे ‘ओव्हरब्रीज’ची निर्मिती हाेणार कधी, असा प्रश्नही वाहनचालकांसह नागरिकांनी उपस्थित केला आहे.
या मार्गावरील रेल्वे फाटकाजवळ ‘ओव्हरब्रीज’ची निर्मिती करावी, ही मागणी फार जुनी आहे. मध्यंतरी रेल्वे प्रशासनाने त्या दिशेने प्रयत्नही केले हाेते. परंतु, शासनाने मध्येच गाेंडखैरी-कळमेश्वर-सावनेर या मार्गाच्या चाैपदरीकरणाचे काम सुरू केले. हा मार्ग कळमेश्वर शहराच्या बाहेरून गेला असल्याने रेल्वे फाटकाजवळील ‘ओव्हरब्रीज’च्या निर्मितीकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे ही मागणी थंडबस्त्यात तर गेली नाही, अशी शंकाही नागरिकांनी उपस्थित केली.
हा मार्ग आंतरराज्यीय असल्याने त्यावरून गाेंडखैरीहून कळमेश्वर मार्गे सावनेर व पुढे मध्य प्रदेशात जाणाऱ्या जड वाहनांची संख्याही माेठी आहे. कारण हा मार्ग नागपूर-सावनेर-छिंदवाडा-ओबेदुल्लागंज (भाेपाळ) या राष्ट्रीय महामार्गाला जाेडला आहे. कळमेश्वरवासीयांना या जड वाहनांचा त्रास हाेऊ नये, तसेच वाहतूक सुकर व्हावी म्हणून या मार्गाला कळमेश्वर एमआयडीसी परिसरातून वळण देण्यात आले आहे. पुढे हा मार्ग कळमेश्वर-काटाेल मार्ग छेदून ब्राह्मणी परिसरातून सावनेरच्या दिशेने जाताे.
या मार्गावरील खडक नदीजवळ ‘ओव्हरब्रीज’चे बांधकाम केले जात आहे. मात्र, रेल्वे फाटकाजवळील ‘ओव्हरब्रीज’च्या निर्मितीकडे लक्ष दिले जात नसल्याने या मार्गावरील गावांमधील नागगरिकांसह शेतकरी, कर्मचारी, कामगार व विद्यार्थ्यांना राेज अनेक अडचणींना ताेंड द्यावे लागते. त्यामुळे ‘ओव्हरब्रीज’ची निर्मिती करणे अत्यावश्यक असल्याची माहिती कळमेश्वर शहरासह तालुक्यातील गावांमधील नागरिकांनी दिली आहे.
...
बंद फाटकामुळे मानसिक त्रास
या मार्गावरून शासकीय कार्यालयातील व खासगी कंपन्यातील कर्मचारी, कामगार, कळमेश्वर शहरासह तालुक्यातील सावंगी, लिंगा, उपरवाही, लोणारा, सेलू, आष्टीकला, कळंबी, केतापार यांसह अन्य गावांमधील शेतकरी, नागपूर व विद्यार्थी राेज प्रवास करतात. रेल्वे फाटक दर १५ मिनिटांनी बंद हाेत असल्याने त्यांना फाटकाजवळ रेल्वे गाडी जाण्याची व फाटक उघडण्याची बराच वेळ प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे त्यांना वारंवार बंद हाेणाऱ्या या फाटकामुळे मानसिक त्रासही सहन करावा लागताे.
...
राजकीय उदासीनता कारणीभूत
या रेल्वे फाटकाजवळ ‘ओव्हरब्रीज’ निर्मितीबाबत रेल्वे अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी पाहणी केली हाेती. वास्तवात, कामाला सुरुवात करण्यात आली नाही. याला राजकीय व प्रशासकीय उदासीनता कारणीभूत असल्याचा आराेप नागरिकांनी केला आहे. काहींनी येथे दुचाकीचालकांसाठी ‘अंडरब्रीज’ व्हावा, अशीही मागणी केली. मात्र, पावसाळ्यात ‘अंडरब्रीज’मध्ये पाणी जमा हाेत असल्याने, तसेच चिखलामुळे नवीन डाेकेदुखी हाेणार असल्याचेही जाणकार व्यक्तींनी सांगितले.