नागपूर : शहरालगतच्या भागाला पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. या भागात तीव्र पाणीटंचाई आहे. बहुसंख्य वस्त्यांत नळाचे नेटवर्क नाही. टँकरनेही नियमित पाणीपुरवठा केला जात नाही. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. असे असतानाही पाणीपट्टीत ५ टक्के वाढ करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत ठेवला जाणार आहे. १ मार्च २००९ च्या शासनाच्या निर्णयानुसार नागपूर शहरातील पाणीपट्टी व दर मूल्यांकनाचे अधिकार महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहे. त्यानुसार पाणीपट्टीत दरवर्षी वाढ केली जाते. २०१६ या वर्षासाठी १ एप्रिलपासून पाणीपट्टीत ५ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु शहरालगतच्या भागात नळाचे नेटवर्क नसलेल्या भागाला पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. टंचाईग्रस्त भागाला टँकरद्वारे पाणी उपलब्ध करणे अपेक्षित आहे. परंतु काही वस्त्यांना दिवसाआड तर काही भागात दोन दिवसातून एकदा पाणी मिळते. उन्हाळ्याच्या दिवसात विहिरी आटल्याने नागरिकांना टँकरच्या पाण्यावर विसंबून राहावे लागते. परंतु मागणी करूनही वेळेवर टँकरद्वारे पाणीपुरवठा होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. महापालिके त समावेश करण्यात आलेल्या हुडकेश्वर, नरसाळा तसेच बेसा, बेलतरोडी, भरतवाडा, पुनापूर, पारडी, हिवरीनगर, रमना मारोती, ताजबाग, दिघोरी, मानेवाडा, जोगीनगर, भांडेवाडी, वाठोडा, नारा, नारी, झिंगाबाई टाकळीचा काही भाग, गोरेवाडा आदी भागातील अनेक वस्त्यांत पाणीटंचाई आहे. नागरिकांना उन्हाळ्याच्या दिवसात पाण्यासाठी भटकंती करावी लागते. असे असतानाही पाणी दरवाढ शहरातील सर्व भागाला सरसकट लागू करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)शहरातील १९०० व ५७२ लेआऊ टमधील नागरिकांना नासुप्रकडे विकास शुल्क जमा केले आहे. काही भागातील नागरिकांनी १५ ते २० वर्षांपूर्वी विकास शुल्क जमा केले असतानाही अद्याप या भागात नळाद्वारे पाणीपुरवठा होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. अनधिकृत वस्त्या असल्याने महापालिकेलाही या भागात विकास कामे करता आलेली नाही. वस्त्या नियमित करण्यात आल्यानंतरही या भागातील लोकप्रतिनिधींचा प्रामुख्याने रस्त्यांच्या कामावर जोर असून आवश्यक मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष असल्याने पाणीटंचाईला लोकांना सामोरे जावे लागत आहे.
टंचाईत पाणी महाग!
By admin | Updated: June 8, 2016 02:19 IST