शाळेचा पहिला दिवस म्हणजे शिक्षणाचा श्रीगणेशा. मुलांच्या आणि पालकांच्याही कायम आठवणीत राहणारा हा क्षण. शाळा म्हणजे नेमके काय? हे माहिती नसलेल्या चिमुकल्यांना मात्र आपल्या ताई-दादासारखेच शाळेत जाण्याची उत्सुकता असतेच. पण शाळेच्या पहिल्या दिवशी आई किवा बाबांनी शाळेत सोडल्यावर आई परतीला निघाली की चिमुकल्यांना असुरक्षित वाटते. शाळेच्या आकर्षणापोटी शाळा हवीय पण सोबत आई हवीच. मग काय...आईने परतीचा मार्ग धरला की मुले शाळेत थांबेनाशी होतात. रडारड सुरु होते. आईचा हात अलगद् सुटतो आणि रडता-रडता शाळेतल्या गाण्यात, कवितांत, खेळात नकळतपणे मुले गुंतत जातात. ‘आई...तू मला सोडून जाऊ नको...’ असे म्हणणाऱ्या चिमुकल्यांची आर्त साद मात्र त्यांच्या माउलींना परतू देत नाही. मुलांच्या काळजीपोटी माता शाळेबाहेरच रेंगाळत राहतात. शाळा सुटते आणि रडणारी मुले हसत-हसत पुन्हा आईच्या कवेत येतात. बस्स...हाच नेमका अनुभव होता शाळेच्या पहिल्या दिवसाचा.
डोळ्यात पाणी, शाळेत गाणी
By admin | Updated: June 27, 2015 03:03 IST