लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील वर्षी कोरोना हा विषाणू आपल्यासाठी नवीन होता. संसर्गजन्य असल्यामुळे सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि हातांची स्वच्छता या नियमांचे पालन हाच उपाय आपल्याकडे होता. आता जोडीला कोरोना प्रतिबंधात्मक लस उपलब्ध आहे, त्यामुळे प्रत्येकाने लसीकरण करणे आवश्यक आहे. लसीकरण व नियमांचे पालन हाच कोरोना प्रतिबंधाचा उपाय असल्याचे प्रतिपादन आयएमएचे सहसचिव डॉ. समीर जहांगीरदार आणि डॉ. सुषमा ठाकरे यांनी केले. मनपा आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने आयोजित कोविड संवाद या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात कोविड लसीकरण या विषयावर त्यांनी नागरिकांशी संवाद साधला.
नागपुरात सध्या कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लस उपलब्ध आहेत. दोन्ही लसी सारख्याच परिणामकारक आहेत. त्यामुळे या लसींविषयी शंका मनात ठेवण्याचे काहीही कारण नाही. लसीकरणासाठी ज्या केंद्रावर जी लस उपलब्ध असेल ती घ्या. मात्र ज्या लसीचा पहिला डोस घेतला आहे, त्याच लसीचा दुसरा डोस घ्यावा लागेल, लस घेतल्यानंतरही जर कोरोना पॉझिटिव्ह कुणी येत असेल तर त्याची तीव्रता अत्यंत कमी असते. त्यामुळे भविष्यात कोरोना हद्दपार करायचा असेल तर लसीकरण प्रत्येकाने करणे अत्यावश्यक असल्याचे सुषमा ठाकरे म्हणाल्या.
...
दिशानिर्देशाचे पालन करावे
केंद्राने लसीकरण टप्प्याटप्प्यामध्ये सुरू केले आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सला लस देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील अतिगंभीर आजार असलेल्या व्यक्तींना लस देण्यात आली. आता तिसऱ्या टप्प्यात ४५ वर्षांवरील प्रत्येकाला लस देण्यात येत आहे. सरकारने जाहीर केलेल्या दिशानिर्देशानुसार जे जे लाभार्थी आहेत, त्यांनी लस अवश्य घ्यावी. लस घेतल्यानंतरही कोरोनासंबंधित असलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन समीर जहांगीरदार यांनी केले.