उमरेड : ग्रामीण भागात आजही अनेक शिक्षक उत्तम कार्य करीत आहेत. असंख्य शिक्षकांना कलागुणसंपन्नेची किनारही लाभली आहे. केवळ पुढाकार घेण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाप्रती अधिक रूची निर्माण करावयाची असेल तर आता नावीन्यपूर्ण शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, असे प्रतिपादन नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिला. ते उमरेड उपविभागाच्या ‘बेस्ट प्रॅक्ट्रीस’ कार्यशाळेप्रसंगी बोलत होते. स्थानिक जीवन विकास विद्यालयात पार पडलेल्या या कार्यशाळेत उमरेड, भिवापूर आणि कुही तालुक्यातील केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व विषयतज्ज्ञांचा सहभाग होता. योगेश कुंभेजकर यांनी पुढाकार घेत शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी तसेच शिक्षकांच्या उपक्रमशीलतेला चालना देण्यासाठी सदर कार्यशाळा आयोजित करण्यात आली. कार्यशाळेत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नागपूरच्या प्राचार्या हर्षलता बुराडे, परिविक्षाधीन उपविभागीय अधिकारी सावनकुमार, जिल्हा शिक्षण अधिकारी चिंतामण वंजारी, गटविकास अधिकारी जयसिंग जाधव, जीवन विकास विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र सोनपुरे, पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मनोज पाटील, शारदा किनारकर, प्रकाश लेदे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यशाळेत तीनही तालुक्यातील एकूण सहा शिक्षकांनी प्रातिनिधिक स्वरूपात आपल्या शाळेत राबविलेले उपक्रम सादर करीत उपस्थितांचे लक्ष वेधले. प्रास्ताविक हर्षलता बुराडे यांनी केले. संचालन एकनाथ पवार यांनी केले. आभार मनोज पाटील यांनी मानले. कार्यशाळेसाठी समूह साधन केंद्राने सहकार्य केले.
नावीन्यपूर्ण शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:16 IST