वनश्रमिकांचे धरणे आंदोलन : कामच नाही तर पैसे आणणार कुठून?गणेश खवसे - नागपूरहाताला काम नाही, खिशात पैसे नाही, ओळखीचे माणसं म्हणावे तर इथे कुणीच नाही... आमच्याही मागण्या आहेत, त्या पदरी पाडून घेण्यासाठी हिवाळी अधिवेशनानिमित्त धरणे आंदोलन करण्यासाठी कसेतरी नागपूर गाठले. मात्र धरणे आंदोलनासाठी उभारलेले मंडप घेण्याकरिता अडीच हजार रुपये आणणार तरी कुठून, असा प्रश्न उपस्थित करीत ‘आम्हाला कायम सेवेत घ्या’, अशी आर्त मागणी वनश्रमिकांनी केली आहे. वन विभागात रोजंदारी वनमजूर असलेल्यांनी शासकीय सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी वनश्रमिक संघाच्या वतीने धरणे आंदोलन सुरू केले आहे. पटवर्धन मैदानात हे आंदोलन करण्यात येत आहे. सध्या अनेक संघटनांच्या वतीने तिथे धरणे आंदोलन सुरू आहे. यासाठी त्यांना छोटे मंडप देण्यात येते. मात्र त्यासाठी एका दिवसाकरिता अडीच हजार रुपये आकारण्यात येते. अनेक संघटनांचे पदाधिकारी असे आहेत की त्यांना नोकरी नाही; उपजीविकेचे साधन नाही. नोकरीत सामावून घेण्याच्या मागणीसाठी त्यांनी धरणे आंदोलनाला सुरुवात केली. त्या सर्व संघटनांनी भाड्याने मंडप घेतलेले आहेत. मात्र याला अपवाद आहे नाशिक जिल्हा वनश्रमिक संघ. या संघात केवळ नाशिकच नव्हे तर ठाणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यातीलही वनमजूर असून, त्यांनी उघड्यावर धरणे आंदोलन सुरू केले आहे. सध्या थंडीचे दिवस आहेत. पारा १३ अंशावर आला आहे. अशास्थितीत उघड्यावर कुडकुडत रात्र काढण्याची वेळ वनमजुरांवर आली आहे. या प्रत्येकांनी खूप तर एक शाल आणली आहे. तेवढ्यावरच त्यांना समाधान मानावे लागत आहे. या रोजंदारी वनमजुरांपैकी बरेचसे वनमजूर बुधवारी रात्रीच पटवर्धन मैदानात डेरेदाखल झाले तर काही आज, गुरुवारी दुपारपर्यंत आले. आणखी काही वनमजूर येणार आहेत. मात्र मंडप घेण्यासाठी पैसे नसल्याने बाहेरच धरणे आंदोलन करण्याचा निर्धार या सर्वांनी केला आहे. या धरणे आंदोलनात राजेंद्र साळुंके, मुजम्मिल शेख, भास्कर दाणे, चंदर बरडे, नारायण सहारे, दिलीप सुनअहिरे, लहुशंकर बोरसे, कृष्णा माडी, संभाजी मदने, बाबा चव्हाण, सर्जेराव वगरे, प्रकाश काळंभे, संभाजी जाधव, गणपती कांबळे, तानाजी चव्हाण, प्रवीण तोडकर, सदाशिव शिंदे, पोपट मेधने आदी सहभागी झाले आहेत.वनमजुरांच्या या आहेत मागण्यावन विभागातील ५०८९ रोजंदारी वनमजुरांना कायम करण्यासंदर्भात शासन निर्णय झाला. त्यासाठी वनमजुरांची यादी तयार करण्यात आली. त्या यादीतून केवळ ३०१४ वनमजुरांना कायम करण्यात आले. मात्र उर्वरित वनमजूर सेवेत कायम होण्याच्या प्रतीक्षेत आहे. त्यांना सेवेत कायम करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी वनमजूर धरणे आंदोलन करीत आहे. वर्षाचे २४० दिवस याप्रमाणे पाच वर्ष सेवेत असलेल्यांना कायम करण्यात येईल, असा शासन निर्णय आहे. मात्र पात्र वन मजुरांना डावलण्यात आले. ज्यांना सेवेत घेतले नाही अशांनी न्यायालयात धाव घेतली. परंतु, त्यांना सेवेत घेण्याचे आश्वासन देत न्यायालयातून ‘केस’ मागे घेण्याचे सांगण्यात आले. त्यानुसार त्यांनी ‘केस’ मागे घेतली. यानंतरही त्यांना सेवेत घेतलेले नाही. मागील वर्षी हिवाळी अधिवेशनात धरणे आंदोलन करीत असताना ८ डिसेंबर २०१३ रोजी देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदन देण्यात आले होते. त्यापैकी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री तर इतर मंत्री आहेत. किमान मुख्यमंत्र्यांनी तरी या विषयाकडे गंभीरतेने लक्ष द्यावे, अशी आर्त विनवणी वनमजुरांनी केली आहे.
धरणे मंडपासाठी पैसे नाही; बाहेरच मांडला ठिय्या!
By admin | Updated: December 12, 2014 00:31 IST