रेवराल : ऊस गाळपाचा हंगाम सध्या सुरू आहे. मौदा तालुक्यात उसाचे क्षेत्रफळ जास्त नाही. मात्र, बाबदेव येथे साखर कारखाना असल्याने येथे जिल्ह्यातून ऊस विक्रीला आणणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. ट्रॅक्टरद्वारे येथे ऊस आणला जातो. पण, या ट्रॅक्टरच्या माध्यमातून उसाची ओव्हरलोड वाहतूक केली जात असल्याने या परिसरात अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ऊस वाहतूक करताना वाहतूकदारांना उसाच्या वजनाप्रमाणे वाहतुकीचे भाडे मिळते. त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त उसाची वाहतूक केली जात असल्याचे दिसून येत आहे. यासोबतच ट्रॅक्टर चालकांकडून वाहतूक नियमांचे सातत्याने उल्लंघन केले जात आहे. याकडे पोलिसांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
ऊस वाहतुकीची चढाओढ
उसाच्या ट्रॅक्टरच्या दोन ट्रॉलीत साधारण २० ते २५ टनापर्यंत ऊस भरण्याची क्षमता असते. ट्रॅक्टर मालक कमी वेळात जास्त टन वाहतूक करण्याच्या लालसेने दुप्पट म्हणजे ४० टनाच्या पुढे ऊस भरण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे ट्रॉली पलटी झाल्यास जीवित हानी होण्याची शक्यता आहे. क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरल्याने ट्रॉली पलटल्यानंतर ती पुन्हा भरण्यासाठी चार ते पाच हजार रुपये खर्च येतो. तो भुर्दंड शेतकऱ्यांना सोसासा लागतो.
अल्पवयीन चालक
ट्रॅक्टरद्वारे उसाची वाहतूक करणारे अनेक चालक अल्पवयीन आहेत. त्यात काही मद्यपान करून आणि मोठ्या आवाजात ट्रक्टरमध्ये गाणी लावून वाहने चालवितात. त्यामुळे ध्वनी प्रदूषणाबरोबरच अपघाताची शक्यता बळावली आहे. पोलिसांकडून यावर नियंत्रण हवे, अशी मागणी तालुक्यातून जोर धरत आहे.
-
बाबदेव येथील साखर कारखाना सुरू असून, या ठिकाणी मौदा तालुक्यातील व जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने ऊस विक्रीला आणतात. पण, ट्रॅक्टर चालक एका ट्रॉलीला दुसरी ट्रॉली जोडून उसाची वाहतूक करतात. ही ओव्हरलोड वाहतूक भंडारा - नागपूर राष्ट्रीय महामार्गावर सुरू आहे. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता बळावली आहे. पोलिसांनी लक्ष देत ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करावी.
- शिवा आकरे, जिल्हा संघटक, मनसे