लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मध्य नागपुरातील प्रभाग १८ मधील गंगाबाई घाट लगत नागनदीला मिळणाऱ्या नाल्यात मोठ्या प्रमाणात कचरा व गाळ साचला आहे. पावसाळ्यात पुराचे पाणी कचऱ्यामुळे तुंबल्यास आजूबाजूच्या वस्त्यात शिरण्याचा धोका आहे. दुसरीकडे घाण पाणी साचून राहात असल्याने दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त आहेत. डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे.
या नाल्यालगत भूतेश्वर नगर,शिवाजी नगर, नंदाजी नगर, गायत्री नगर यासह इतरही वस्त्या व झोपडपट्ट्या आहेत. दुर्गधीमुळे स्लममधील नागरिक त्रस्त आहे.
या नाल्यातील तसेच गंगाबाई घाट लगतच्या नागनदीतील गाळ काढण्यासंदर्भात झोनचे सहायक आयुक्त व मनपा प्रशासनाला नागरिकांनी वेळोवेळी निवदने दिली. परंतु प्रशासनाकडून याची दखल घेतली जात नसल्याची माहिती शहर काँग्रेसचे सचिव चंदू वाकोडकर यांनी दिला आहे. साफसफाइं होत नसल्याने नाल्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. नाल्यातील कचरा व गाळ न काढल्यास मनपा प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
...
मान्सून पूर्वतयारी कुठे गेली?
पावसाळ्यात नदी, नाल्याचे पुराचे पाणी लगतच्या वस्त्यात शिरू नये यासाठी महापालिका प्रशासनातर्फे पावसाळा सुरू होण्यापूर्वी नदी, नाले, सफाई अभियान हाती राबविले जाते. यावर्षीही ही मोहीम राबविण्यात आली. शहरातील नदी-नाले स्वच्छ झाल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. प्रत्यक्षात नाले सफाई पूर्ण झाली नसल्याचे चित्र् आहे. परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्याची गरज आहे.