लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुन्हेगारांच्या हल्ल्यात जीव गमावलेल्या शाहरुख खानचा खून हा सुनियोजित पद्धतीने करण्यात आला असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला असून याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
गेल्या २३ मे रोजी २६ वर्षीय शाहरुखचा गणेशनगरात खून करण्यात आला. कोतवाली पोलिसांनी या प्रकरणी बाबल्या ऊर्फ लक्ष्मण हिवराळे, विनायक इस्पाके, बंटी जैस आणि आर. के. पटेल यांना अटक केली होती. बाबल्या वस्तीत भरधाव वेगाने बाईक चालवित होता. शाहरुखचा मित्र आदर्श समुंद्रे याने त्याला बाईक हळू चालवण्याची समज दिली. यावरून तो संतापला. त्याने आपल्या साथीदाराच्या मदतीने हल्ला करून शाहरुखचा खून केला होता. या भांडणात शाहरुखचा काहीही संबंध नव्हता. त्यामुळे त्याचे कुटुंबीय शाहरुखची हत्या एक सुनियोजित षडयंत्र असल्याची शंका व्यक्त करीत आहेत. त्यांच्यानुसार अटक करण्यात आलेल्या आरोपींनी कुणाच्यातरी इशाऱ्यावर खून केला आहे. त्याचप्रकारे खुनानंतर शाहरुखचा मोबाईलही गायब आहे. शाहरुखच्या व्हाॅट्सॲपवर खुनानंतरही मेसेज येत जात होते. याबााबत विचारणा केली असता पोलीसही समाधानकारक उत्तर देत नाहीत.
असे सांगितले जाते की, दुपारपासूनच बाबल्या व त्याचे साथीदार वस्तीत धुमाकूळ घालत होते. त्यांनी दुपारी गणेशपेठ परिसरात मारहाणही केली. यानंतर त्यांनी एसडी हॉस्पिटल चौक आणि लंकेशच्या पानठेल्याजवळ गोंधळ घातला. रात्री ९ वाजता बाबल्याचा आदर्शसोबत वाद झाला. बाबल्याने बाईक चालवण्यावरून झालेल्या वादात आदर्शला जखमी केले. त्याचवेळी शाहरुख बहिणीच्या साक्षगंधासाठी आलेल्या पाहुण्यांसोबत व्यस्त होता. घरातील आवश्यक कामे आटोपून तो घरून बाहेर पडला आणि आरोपींनी विनाकारण त्याचा जीव घेतला. शाहरुख जेव्हा आईच्या पोटात होता, त्याचवेळी त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. तो मावशीच्या कुटुंबासोबत राहत होता. तो नागनदीच्या पुलाजवळ भाजीपाल्याचे दुकान चालवायचा. या दुकानावरूनही त्याचा खून केल्याची शंका वर्तविण्यात आली आहे.