विद्यार्थ्यांनी सीबीएससीऐवजी मातृभाषेत आणि व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून तांत्रिक शिक्षण घ्यावे. हेच उद्दिष्ट ध्यानात ठेवून मेजर हेमंत जकाते विद्यानिकेतन ही शाळा विद्यार्थ्यांना शिक्षणात पारंगत करीत आहे. त्यामुळे शाळेचे अनेक विद्यार्थी उच्चपदावर कार्यरत आहे. त्याचा आम्हाला अभिमान असल्याचे मत शाळेचे सचिव आणि मुख्याध्यापक मधुसूदन मुळे यांनी व्यक्त केले.
बदलत्या शैक्षणिक प्रणालीवर त्यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, शाळेची स्थापना स्व. मारोतराव मुळे आणि स्व. आशाताई मुळे यांनी सन १९८४ मध्ये केली. शाळा म्हाळगीनगर चौक, रिंग रोड, नवीन हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या बाजूला, नागपूर येथे अर्ध्या एकरमध्ये आहे. शाळेत इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत तसेच विज्ञान आणि कॉमर्सचे अकरावी आणि बारावीचे वर्ग आहेत. बालवाडीत प्ले लर्निंगची सोय आहे. शाळा सरकारमान्य आहे. दक्षिण नागपुरातील गरीब व हुशार विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याच्या उद्देशाने शाळा सुरू करण्यात आली. शाळेचा उद्देश सफल झाला आहे. विद्यार्थी डॉक्टर, अभियंते, उद्योजक असून काही विदेशात नोकरीला आहेत.
प्रवेशादरम्यान विद्यार्थ्यांकडून डोनेशन आणि इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत विद्यार्थ्यांकडून शालेय शुल्क घेण्यात येत नाही. त्यामुळे गत शैक्षणिक सत्रात शाळेत २३०४ विद्यार्थी होते आणि ६३ शिक्षक आहेत. यंदा अकरावी आणि बारावीला सरकारकडून मान्यता मिळाली आहे. शाळेत एलिमेन्ट्री, इंटरमिजिएट, स्कॉलरशिप व नॅशनल टॅलेंट सर्चचे वर्ग होतात. एनसीसी, स्काऊट गाईड तसेच रोहर रेंजरचे एक युनिट नागपुरात केवळ आमच्या शाळेत आहे. शाळेला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहे. महाराष्ट्रातील उत्कृष्ट स्काऊट गाईड शिक्षणाबद्दल एक लाख रुपयांचा पुरस्कार चार वर्षांपूर्वी मिळाला आहे. याशिवाय एनसीसीमधून पंतप्रधान पुरस्कृत पारितोषिक २०२१ चा उत्कृष्ट कॅडेड पुरस्कार नागपुरात केवळ याच शाळेला मिळाला आहे.
कोरोना काळात जॉयफूल ऑनलाईन शिक्षणावर भर देण्यात आला. शिक्षकांनी ऑनलाईनद्वारे वर्ग घेतले. महाराष्ट्र शासनानेही क्लिप पाठविल्या होत्या. दूरदर्शन व दूरचित्रवाणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात आले. शाळेत ६४ कॉम्प्युटरची लॅब आहे. यावर्षी केंद्र सरकारकडून अटल थिंकिंग लॅबसाठी २० लाख रुपये मंजूर झाले आहेत. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांसह परिसरातील अन्य शाळेतील विद्यार्थी नि:शुल्क शिक्षण घेऊ शकतात. विद्यार्थी आणि पालकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन तयार करण्याचा लॅबचा उद्देश आहे.
भविष्यातील उपक्रमांची माहिती मुळे यांनी दिली. शाळेच्या सर्व वर्गखोल्या अद्ययावत आणि व्हर्च्युअल करण्यात येणार आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध स्पर्धा परीक्षेत विद्यार्थी कसे टिकतील आणि यशस्वी होतील, यावर विशेष भर देण्यात येणार आहे. याकरिता शाळेत विशेष वर्ग घेण्यात येणार आहे. तसे पाहता जेईई आणि पीएमटी या परीक्षा शासनाने रद्द कराव्यात. खासगी शिकवणी वर्गाचे लाखात असलेले शुल्क वाचवावे, या उद्देशाने विद्यार्थ्यांना सर्व शिक्षण शाळेत मिळावे, यावर भर आहे. अभ्यासक्रमाचा अंतर्भाव शाळेतच करावा, असे त्यांनी स्पष्ट केले. एनसीसी विद्यार्थ्यांना रिझर्व्हेशनसाठी प्रयत्न आणि शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. शाळेला तांत्रिकदृष्ट्या अद्ययावत करण्याचा व्यवस्थापनाचा मानस आहे. या दिशेने पावले उचलली आहेत. शाळेला मेजर हेमंत जकाते यांची मदत होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सामाजिक कार्यातही शाळेचा हातखंडा आहे. दरवर्षी वृक्षारोपण, तंबाखूविरोधी अभियान, पोलिओ जनजागृती रॅली, स्नेहसंमेलन, शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात येते. याशिवाय विद्यार्थिनींच्या आरोग्यविषयक समस्यांसाठी त्यांना डॉ. मंजूषा गिरी यांच्यातर्फे वारंवार समुपदेशन करण्यात येते. या वैद्यकीय मार्गदर्शनामुळे विद्यार्थिनींना निश्चितच फायदा होतो.
मॉडर्न अद्ययावत शाळा, विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञान आणि नवी उपकरणे उपलब्ध करून देतानाच बदलत्या शैक्षणिक युगात विद्यार्थी स्पर्धा परीक्षेस कसे सामोरे जातील, यावर कटाक्षाने भर देण्यात येत आहे. विद्यार्थिनी शाळेचा देशात नावलौकिक मिळवावा, हा दृष्टिकोन ठेवून विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष देण्यात येते. ऑनलाईन शिक्षण नि:शुल्क देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न धावता व्यावसायिक शिक्षण घेऊन पुढे जावे. शाळेत विद्यार्थ्यांना घरून ने-आण करण्यासाठी दोन व्हॅन आहेत. या माध्यमातून गरीब आणि हुशार विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय करण्यात आली आहे.
शिला मधुसूदन मुळे या शाळेच्या अध्यक्षा आहेत. याशिवाय संचालकांमध्ये डॉ. रवी भेलोंडे, इंजि. रवींद्र जनबंधू, डॉ. राहुल देवतळे, डॉ. शिवानी देवतळे, अमर जयपूरकर यांचा समावेश आहे.