उमरेड : उमरेड तालुक्यातील सुमारे १५ गावातील पथदिव्यांची वीज ऐन होळीच्या पर्वावर खंडित करण्यात आल्याने गावकऱ्यांसह सरपंच संघटनेने संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. शनिवारी सरपंच संघटनेने उमरेड पंचायत समितीच्या परिसरात एकत्रित येत प्राथमिकस्तरावर चर्चा केली. यामध्ये ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे निवेदन सोपवून, या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी विनंती करण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्रामपंचायत अस्तित्वात आल्यापासून गावातील पथदिव्यांच्या बिलाची रक्कम जिल्हा परिषदमार्फत भरली जात होती. मागील पाच वर्षांपासून त्यांनीही पाठ दाखविली. शिवाय ही रक्कम ग्रामपंचायतीने भरावी अशी सूचनाही देण्यात आली नाही, अशीही चर्चा यावेळी झाली. एका ग्रामपंचायतमध्ये बहुतांश गावांचा अंतर्भाव होतो. प्रत्येक ग्रामपंचायतीची दिवाबत्तीची आवक वर्षातून ३० रुपये कुटुंब याप्रमाणे आहे. यामध्ये वर्षभर लाईट लावणे, दुरुस्ती आदी असल्याने पथदिव्यांच्या बिलाची रक्कम भरणे शक्य होत नाही, अशीही व्यथा व्यक्त करण्यात आली. पाणीपुरवठ्याचे बिल भरण्यास आम्ही तयार आहोत. सध्या कोरोनामुळे ग्रामपंचायतची कर वसुली थंडबस्त्यात आहे. कोरोनाच्या विपरीत परिस्थितीत शेतकरी, कष्टकरी अडचणीत असताना गावातील पथदिवे बंद करून गावकऱ्यांना अंधारात ठेवणे योग्य नाही. जनतेला वेठीस धरण्याचा हा प्रकार असून, या संपूर्ण प्रकरणात गावकरी केवळ सरपंचावर दोषारोपण करीत आहेत. ग्रामपंचायतकडे याबाबत कोणताही निधी नसल्याने राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी शासकीय निधीतून ही व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी सरपंच संघटनेने केली आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अश्विन उके, सचिव राजकुमार राऊत, राजेश हजारे, विजय आंभोरे, किसना गिरसावळे, योगिता मानकर, सीमा कुंभरे, पुरुषोत्तम बचाले, छाया शेरके, मधू सातपुते आदी उपस्थित होते.
पथदिव्यांच्या समस्येसाठी सरपंच संघटना एकवटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:09 IST