लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इतवारी येथील लाडपुरास्थित श्री पार्श्वप्रभू दिगंबर जैन मंदिरच्या सन्मती भवनात आचार्य श्री पंचकल्याणकसागरजी महाराज यांचे प्रवचन सुरू आहेत. मंगळवारी आचार्यश्री यांनी आचार्यश्री विमलसागरजी महाराज यांच्या २६व्या पुण्यतिथीवर प्रबोधन केले.
विमलसागरजी यांनी ज्यांनाही आशीर्वाद दिले, ते यशस्वी झाले. साधू म्हणजे विनय, वात्सल्य आणि प्रेमाची मूर्ती असते. ते जगताच्या कल्याणात स्वत:चे कल्याण असल्याची भावना ठेवतात. त्यांच्याकडून श्रावकांनी सप्त व्यसन त्याग, अष्टमुलगुण धारण, रात्री भोज त्याग, प्रतिदिन देवदर्शन आदींचे नियम स्वीकारले आणि स्वत:चे कल्याण करवून घेतले. जेथेही विमलसागरजी जात तेथे पाठशाळा, अतिथीगृह सुरू होऊन जात. तन, मन आणि धनाचे रोगी त्यांच्याकडे गेल्यावर णमोकार जपाचा आशीर्वाद घेत आणि स्वस्थ होत असत. त्यांनी ५२६६ निर्जल उपवास ठेवले होते, असे पंचकल्याणकसागरजी म्हणाले. यावेळी अध्यक्ष सतीश पेंढारी व डॉ. नयना संगई यांनीही आपले विचार व्यक्त केले.
दीपप्रज्वलन मंत्री उदय जोहरापूरकर, पन्नालाल खेडकर, महासमिती अध्यक्ष सुनील पेंढारी, किरण जोहरापुरकर, प्रचार-प्रसार मंत्री हिराचंद मिश्रीकोटकर, विलास आग्रेकर यांनी केले. मंगलाचरण विभाष गहाणकर व गजल गहाणकर यांनी गायले. महिला मंडळाने शास्त्र भेट केले. धर्मसभेचे संचालन सूरज पेंढारी यांनी केले. याप्रसंगी दिनकरराव जोहरापूरकर, मंत्री दिलीप राखे, राजकुमार खेडकर, द्विपेंद्र जोहरापूरकर, राजकुमार जेजानी, सुरेश आग्रेकर, डॉ. सुरेश जोहरापूरकर, सुभाष देवलसी, दीपक दर्यापूरकर, गजकुमार चवरे, नरेंद्र तुपकर उपस्थित होते.
आजचे कार्यक्रम
सन्मती भवनमध्ये ३० डिसेंबरला विश्वशांती आणि कोरोना संक्रमणाच्या समाप्तीसाठी भगवान पार्श्वनाथ यांचा अभिषेक केला जाईल.
.......