१४.५० कोटीचे विशेष अनुदान : पालकमंत्री बावनकुळे यांचे प्रयत्ननागपूर : जिल्ह्यातील रस्त्यांवरील खड्डे व रस्त्यांची पावसामुळे झालेली खराब स्थिती पाहता पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्ह्याला विशेष आणि वैशिष्ट्यपूर्ण अनुदान म्हणून १४.५० कोटी रुपये मिळाले आहेत. ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी कधीही एवढा निधी या जिल्ह्याला मिळाला नाही. जिल्ह्यातील आठ नगर परिषदांना शासनाने हा निधी दिला आहे. यामुळे ग्रामीण भागातील अनेक रस्ते आता चकचकीत होणार आहेत.रामटेक, नरखेड, काटोल, उमरेड, सावनेर, कळमेश्वर, मोहपा या नगर परिषदांना शासनातर्फे प्रत्येकी एक कोटीप्रमाणे सात कोटी रुपये अनुदान देण्यात आले आहे. याशिवाय ७ कोटी ५० लाख रुपये वैशिष्ट्यपूर्ण अनुदान म्हणून काटोल, सावनेर, कळमेश्वर, मोहपा व खापा या नगरपरिषदांना देण्यात आले आहेत. या १४.५० कोटी निधीमुळे जिल्ह्यातील आठ नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या जनतेला सुखद दिलासा मिळणार आहे. जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी रस्त्यांच्या अवस्थेबाबत पालकमंत्र्यांना भेटून तक्रारी केल्या होत्या. या तक्रारीची दखल घेत हा निधी पालकमंत्र्यांनी खेचून आणला. (प्रतिनिधी)
ग्रामीण रस्ते होणार चकचकीत
By admin | Updated: September 1, 2016 03:08 IST